Friday, March 6, 2020

Vajreshwari and Hingula Devi story in Marathi

वज्रेश्वरी आणि हिंगुळा
हिंगुळा देवीचे बलुचिस्तान येथील हिंगलज (पाकिस्तान) येथे मूळ स्थान आहे. गुप्तरूपाने राहत असलेल्या शंकरास पार्वतीने हिंगुळा नदीच्या ठिकाणी शोधून काढले.


हिंगुळा देवीचे बलुचिस्तान येथील हिंगलज (पाकिस्तान) येथे मूळ स्थान आहे. गुप्तरूपाने राहत असलेल्या शंकरास पार्वतीने हिंगुळा नदीच्या ठिकाणी शोधून काढले. यामुळे हिंगुळा क्षेत्राला हे नाव प्राप्त झाले. या ठिकाणी सतीचे ब्रह्मरंध्र गळून पडले होते. म्हणून हे एक शक्तिपीठ म्हणून मानले जाते.

वज्रेश्वरी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची देवी. या देवीचे स्थान पालघर जिल्ह्य़ामधील वसई येथील वडवली या गावात आहे. हा परिसर वज्रेश्वरी या नावानेच प्रसिद्ध आहे. देवीचे मंदिर उल्हास नदीच्या तीरावरच्या टेकडीवर आहे. या देवतेस वज्रेश्वरी नाव कसे प्राप्त झाले यासंबंधी कथा दिगंबर स्वामी रचित ‘वज्रेश्वरी माहात्म्य’ या पोथीत सापडते.
पोथीनुसार प्राचीनकाळी वज्रेश्वरी भागात घनदाट जंगल होते. त्या वेळी तानसा नदीच्या भागात उग्रसुर नावे एक दैत्य राज्य करीत होता. या दैत्यास सिंहमार आणि कलिकाळ हे पराक्रमी पुत्र होते. शक्तीने धुंद झालेले हे असुर सर्वत्र धुमाकूळ घालू लागले आणि त्यामुळे ऋषीमुनींच्या यज्ञयागादी कर्मात त्यांचा त्रास होऊ लागला. वारंवार विघ्न आणणाऱ्या या दैत्यांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी या ऋषीमुनींनी देवीची कृपा संपादन करण्याचे ठरवले. त्यांनी यज्ञास आरंभ केला. या यज्ञाचे ऋत्विज वशिष्ठमुनी होते. यज्ञ समारंभात विविध देव-देवतांचे मंत्रोच्चारांनी आवाहन करण्यात आले. सर्व देवतांना हविर्भाग मिळाला. मात्र इंद्रास आवाहन करण्याचे राहून गेले. वशिष्ठांनी हे हेतुत: परस्पर केले असे समजून क्रोधित झालेल्या इंद्राने त्यांच्यावर वज्र प्रहार केला.
इंद्र झाला कोपायमान
मम नामें का न दिले हवन?
आतां निश्चये मी विंध्वसीन
हा त्रिचांडी याग
वसिष्ठावरी सोडिता वज्र
पार्वतीने गिळिले समग्र
म्हणोनि वज्रेश्वरी नाम
पार्वतीही पावली

वसिष्ठांवर फेकलेले वज्र पार्वतीने गिळले म्हणून तीस ‘वज्रेश्वरी’ हे नाम प्राप्त झाले. वज्रेश्वरीचे सांप्रत असलेले मंदिर पेशवेकालीन असून पोर्तुगीजांवर जय मिळवल्यावर चिमाजी अप्पा यांनी सुभेदार शंकराजी केशव यांच्यातर्फे जीर्णोद्धार केला. वरील माहात्म्यामधील कथा पाहिल्यावर मुंबादेवी माहात्म्याची आठवण होते. येथे ही देवी दैत्याचा नाश करण्याच्या हेतूने पृथ्वीतलावर येते आणि त्याचा नाश करते. वज्रेश्वरीमाहात्म्य हे पेशवेकाळात वसईच्या मोहिमेनंतर कधीतरी लिहिले गेले असावे. वज्रेश्वरी ही दैवज्ञ ब्राह्मण (सोनार), पाचकळशी, सुतार आणि वाडवळ, सूर्यवंशी क्षत्रिय इत्यादी ज्ञातींची कुलस्वामिनी आहे.
नवनाथांच्या पोथीमधील आठव्या अध्यायात वज्रेश्वरी आणि हिंगुळजा या देवींचे उल्लेख आढळतात. या पोथीनुसार गोरक्षनाथ आणि या दोन्ही देवींमध्ये युद्ध झालेले दिसते. या युद्धात गोरक्षनाथांचा जय होतो आणि हरलेल्या या दोन्ही देवींना गोरक्षनाथ येथेच कायम राहण्याचा आदेश देतत. हिंगुळा देवीचे बलुचिस्तान येथील हिंगलज (पाकिस्तान) येथे मूळ स्थान आहे. गुप्तरूपाने राहत असलेल्या शंकरास पार्वतीने हिंगुळा नदीच्या ठिकाणी शोधून काढले. यामुळे हिंगुळा क्षेत्राला हे नाव प्राप्त झाले. येथील देवी अष्टभुजा असावी, असे अनुमान अनेक संशोधक आणि तज्ज्ञांचा आहे. या ठिकाणी सतीचे ब्रह्मरंध्र गळून पडले होते. म्हणून हे एक शक्तिपीठ म्हणून मानले जाते.
हिंगुळा पुराणात या देवीची माहिती दिली आहे. रावणावर विजय मिळवून आल्यावर तो या देवीचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. त्या वेळी देवीच्या दूतांबरोबर रामाचे युद्ध झाले व त्यास माघार घ्यावी लागली. मग त्याने देवीची प्रार्थना केली आणि मग देवीने त्यास दर्शन दिले. राम ज्या मार्गाने या देवीचे दर्शन घेण्यासाठी गेला, त्या मार्गावर अनेक तीर्थे उत्पन्न झाली. या देवीचे भारतात बरेच भक्त आहेत. मुसलमान बंधू हिला नानीबिबी म्हणून भजतात.
चौल येथील हिंगुळा देवी ही बौद्ध विहारात पाहायला मिळते. बौद्ध विहारात एका हिंदू देवतेचे स्थान कसे असू शकते? कोणत्याही धर्माचे पवित्र ठिकाण असो, त्या ठिकाणी इतर दैवतांची स्थापना केल्याने त्या दैवताचे पावित्र्य काही कमी होत नाही. ते ठिकाण सदैव पवित्र असते. याचे उदाहरण म्हणजे कार्ले येथील एकवीरा देवी होय. कार्ले येथे बौद्ध विहार व भारतामधील सर्वात मोठा चैत्य आहे. या लेणींसमोर या देवीचे एक लहानसे मंदिर पाहावयास मिळते. सह्य़ाद्रीखंडानुसार अदितीने तप केल्यावर शंकराने तिच्यावर प्रसन्न होऊन तुझा अवतार भूतलावर इश्वाकू वंशातील रेणुराजाच्या घरी होईल असे म्हटले. तसेच तुझे मूळ नाव रेणुका असे असेल व तू भूतलावर एकवीरा या नावाने प्रसिद्ध होऊन तुला पाच पुत्र होतील, हेदेखील सांगितले. दुसऱ्या एका समजुतीप्रमाणे रेणुकेच्या पोटी परशुराम हा एकच वीरपुत्र जन्म पावला म्हणून तिला एकवीरा म्हणतात. ही देवी कोळी, कासार, पाचकळशी, सुतार आणि वाडवळ, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, इत्यादी ज्ञातीमात्रांची देवी आहे.
या देवीचा अग्रपूजेचा मान कोळी समाजाचा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक रामोशी कोळी यांनी आपले मूळ गाव सोडले आणि स्वराज्याच्या स्थापनेसाठी येथे येऊन हातभार लावला. या कोळी समाजाच्या स्थलांतरामुळे या देवीचेही स्थलांतर झाले असावे.

No comments:

Post a Comment

Please do write your suggestions and thoughts.