Friday, March 6, 2020

Maa Saraswati Devi Mandire Story in Marathi

सरस्वती शारदादेवीची मंदिरे

तुळजाभवानी, अंबाबाई, रेणुका माता या देवींची मंदिरं आपल्याला माहीत असतात.


तुळजाभवानी, अंबाबाई, रेणुका माता या देवींची मंदिरं आपल्याला माहीत असतात. पण याबरोबर आपल्या देशात काही ठिकाणी सरस्वतीची मंदिरेही होती, आहेत. त्यांचा आढावा

सरस्वतीचा स्वतंत्र असा संप्रदाय नाही आणि ही देवी कुणाचीही कुलदैवत वा परंपरागत आराध्य दैवत असल्याचे ऐकिवात नाही. अश्विनी नवरात्र, कार्तिक शुक्ल पंचमी (ज्ञानपंचमी) व माघ शुक्ल पंचमी (वसंत पंचमी) असे वर्षांतील काही निवडक दिवस सरस्वतीच्या वाटणीला आलेले आहेत. या तिथीला तिची पूजा करतात. त्या निमित्ताने पाटीपूजन, पुस्तकांची पूजा होते आणि मुलांना शाळेत घालण्याचा समारंभही पार पडतो; पण वर्षांतील या तिथी सोडता, देवीची नित्य पूजा इतर देवांप्रमाणे फारशी प्रचलित नाही. त्यामुळे साहजिकच सरस्वतीला धार्मिक वा लौकिकदृष्टय़ा फारशी लोकप्रियता लाभली नाही. परिणामत: तिची प्रतिष्ठापना मंदिरात मर्यादित स्वरूपात झाली आणि सरस्वती ही मुख्य वा प्रधान देवता असलेली फार थोडी स्वतंत्र मंदिरे बांधली गेली. त्यांपैकी आजमितीस हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीसुद्धा मंदिरे अवशिष्ट नाहीत. अलीकडे विसाव्या शतकात काही सरस्वतीची स्वतंत्र मंदिरे बांधण्यात आली आहेत.

आज अवशिष्ट असलेल्या मंदिरांत आद्य शंकराचार्य (इ. स. ७८८-८२०) यांनी स्थापन केलेल्या सरस्वतीच्या – शारदेच्या शृंगेरी येथील मंदिराविषयी एक आख्यायिका आहे. शारदा पूर्वजन्मी ब्रह्मदेवाची पत्नी सरस्वती होती. तिला दुर्वास ऋ षींच्या शापामुळे भूलोकी जन्म घ्यावा लागला. तिचा विवाह मंडनमिश्र या विद्वान पंडिताशी झाला. शंकराचा अवतार शंकराचार्य यांचे दर्शन झाल्यामुळे ती शापमुक्त झाली आणि निजधामी जाण्यास निघाली. तेव्हा शंकराचार्यानी तिला विनंती केली की, तिने शृंगेरी इथे वास्तव्य करून भक्तजनांची सेवा घ्यावी. तिने ती विनंती मानली आणि शृंगेरीला जाऊन तुंगा नदीत जलसमाधी घेतली. तिचा आत्मा सत्यलोकी गेला आणि पार्थिव देह तिथेच शिलारूपात राहिला. शंकराचार्यानी त्या शिळेवर चक्र कोरले आणि शारदेची चंदनमूर्ती बनवून तिची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केली. तिला शारदांबा म्हणतात. ती शृंगेरीच्या शारदा मठाची उपास्य देवता आहे. पुढे विद्यारण्यांनी शारदा मंदिर बांधले. त्या वेळी त्यांनी शारदेच्या काष्ठमूर्तीच्या जागी पंचलोह विग्रह धातूची मूर्ती प्रतिष्ठित केली. हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्यात गर्भगृह, सभामंडप (महामंडप) आणि प्राकार  आहे. हे मंदिर द्राविड वास्तुशैलीचा उत्तम नमुना असून त्याला तीन दरवाजे आहेत. थोडय़ा उंचीवर बांधलेला महामंडप भव्य असून त्याचे छत दोन स्तंभ रांगांवर आधारित आहे. त्या स्तंभांवर देव-देवतांच्या मूर्तीचे नक्षीकाम आहे. प्राकारातील  देवळांत गणपती आणि भुवनेश्वरी यांच्या सुबक मूर्ती आहेत. मंदिरात अनेक धार्मिक समारंभ संपन्न होतात. त्यांपैकी आश्विन महिन्यातील शारदोत्सव धूमधडाक्याने साजरा करण्यात येतो. मंदिरात अभिषेक, पूजाअर्चा आणि धूपदीपनैवेद्यादी धार्मिक विधी व उपचार नियमित चालू असतात.

22-lp-devi
कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्हय़ात धारवाडच्या पूर्वेस सुमारे ६७ कि.मी.वर गदग हे व्यापारी शहर वसले आहे. या शहराचा प्राचीन कन्नड व संस्कृत साहित्यांतून तसेच काही शिलालेखांतून क्रतुक, क्रतुपूर, कर्डुगू, गलडुगू, गडुगू इत्यादी भिन्न नावांनी उल्लेख आढळतो. शहरात वीरनारायण, सोमेश्वर, त्रिकुटेश्वर आणि सरस्वती ही चार प्रमुख व प्राचीन मंदिरे आहेत. त्यांपैकी त्रिकुटेश्वर व सरस्वती ही दोन मंदिरे गदगच्या दक्षिण भागात एकाच प्रांगणात बांधलेली आहेत. सरस्वतीचे मंदिर त्रिकुटेश्वर मंदिरापेक्षा आकाराने लहान असून ते त्रिकुटेश्वराच्या दक्षिणेस पूर्वाभिमुख बांधले आहे; तथापि आकाराने लहान असूनसुद्धा कलाकुसरीचा नाजूकपणा आणि अलंकरण यांमुळे ते उठून दिसते. मंदिराचे वास्तुविधान चतुरस्र असून उघडा मुखमंडप अणि गर्भगृह एवढाच मंदिराचा भाग अवशिष्ट आहे व शिखर पडले आहे. प्रांगणात सापडलेल्या पश्चिम चालुक्य राजा दुसरा आहवमल्लदेव  (कार, १०६८- १०७६) याच्या कोरीव लेखत सरस्वती मंदिराच्या देखभालीसाठी दान दिल्याचा उल्लेख आहे, त्यावरून हे मंदिर तत्पूर्वी केव्हा तरी चालुक्य राजांनी बहुधा आहवमल्लदेवाचे पिताजी सोमेश्वर आहवमल्ल यांनी बांधले असावे. मुखमंडपातील अठरा स्तंभांवर नाजूक अलंकरण असून चालुक्य शिल्पकलेचा आविष्कार त्यांतून दिसतो. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले दोन स्तंभ विशेष कलात्मक आहेत. स्तंभांवरील अलंकरणात लहान देवळ्या, छोटे स्तंभ, देवदेवतांच्या छोटय़ा प्रतिमा, त्यांचे सेवक, सिंह, शरभादी व्याल व इतर भौमितिक आकृतिबंध आहेत. हे शिल्पांकन उठावात असून यांतील देवदेवतांनी विविध प्रकारची आभूषणे घातली आहेत. मुखमंडपाचे आयताकार छत साधे असून त्याच्या मध्यभागी कमळकलिकात उत्फुल्ल कमळ कोरले आहे. सरस्वतीच्या अवशिष्ट प्राचीन मंदिरांत सुस्थितीत असलेले कदाचित हे एकमेव मंदिर असावे.

या मंदिराच्या गर्भगृहात उंच पीठावर मोरावर कमळात अर्धपर्याक आसनात विराजमान झालेली सरस्वतीची मानवी आकाराची (सु. पाच फूट चार इंच) पूर्णाकार मूर्ती आहे. या ठिकाणी देवी चतुर्भुज असून तिचे चारही हात कोपरापासून तुटलेले आहेत; परंतु तिची घडण अत्यंत नाजूक व सफाईदार आहे. तिने सुरेख तलम वस्त्र परिधान केले असून तिचे कुरळे केस करंड मुकुटातून बाहेर आलेले दिसतात. तिच्या अंगावर बाजुबंद, कुंडले आणि गळ्यात रत्नाहार व माळा आहेत. तिची मेखला नक्षीदार असून तीत रत्ने आहेत.

चोल वंशातील विक्रम चोल (कार. १११८-११३५) राजाच्या पदरी ओत्तकुठर नावाचा एक विद्वान कवी होता. तो सरस्वतीचा मोठा भक्त; त्याला आपली प्रतिभा व बुद्धी ही सरस्वतीची कृपा व देणगी आहे, असे मनोमन वाटे, तो ‘वरकवी’ (श्रेष्ठकवी) म्हणून दरबारात ख्यातनाम होता. त्याने राजाचा मुलगा दुसरा कुलोत्तुंग (कार. ११३३-११५०) आणि त्याचा मुलगा दुसरा राजराजा यांना शिकविले होते. अशा प्रकारे तीन पिढय़ांचा तो राजगुरू होता. सरस्वतीची निरंतर सेवा घडावी म्हणून त्याने अरसिलर नदीकाठी सरस्वतीचे मंदिर बांधण्याची इच्छा चोल राजाकडे केली. चोल राजाने त्याच्या विनंतीचा मान राखून सरस्वतीचे एक मंदिर तमिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात कुंभकोणम- करईक्कल रस्त्यावरील मथिलदुथुरई गावाजवळ कुथनूर या ठिकाणी अरसिलर नदीकाठी बांधले. कुथनूरला अम्बपुरी असेही म्हणतात. चोल राजांच्या बाराव्या शतकातील एका शिलालेखात ओत्तकुठरने मंदिर बांधल्याचा उल्लेख असून ओत्तकुठरला त्याच्या सेवेसाठी अग्रहार दिल्याची नोंद त्यात आहे. त्याच्या ‘तक्कयगपरणी’ या तमिळ भाषेतील काव्यात सरस्वतीचा उल्लेख त्याने पुढील शब्दांत ‘अयंगरई सोल किलयी’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला असून त्याचा भावार्थ ‘जी नदीकाठी वास करते’ असा आहे. यावरून कुथनूरच्या मंदिरासंबंधीच तो बोलत असावा हे निश्चित. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील इ. स. १४९२ च्या कोरीव लेखात कोणा पुरुषोत्तम नावाच्या सधन गृहस्थाने मंदिराची डागडुजी व जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे.

या मंदिराचे बांधकाम चोल वास्तुशैलीत इ. स. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाले असावे, हे नक्कीच!  या भव्य मंदिराचे गर्भगृह, अर्धमंडप, सभामंडप, वाहनमंडप, योगशाळा असे भाग असून सभोवती प्राकार  आहे. आणि मुख्य प्रवेशद्वारावर गोपूर बांधलेले आहे. गर्भगृहात सरस्वतीची अप्रतिम चतुर्भुज पाषाणमूर्ती असून देवी उत्फुल्ल कमलासनात बसलेली आहे. तिच्या वरच्या दोन्ही हातांत (उजवा- डावा) अनुक्रमे अक्षमाला व देठासह कमळ आहे आणि खालच्या दोन हातांपैकी उजवा अभय मुद्रेत असून डाव्या हातात पोथी आहे. देवीचे वाहन हंस वा मयूर कोठेच दिसत नाही;  मात्र मुखाच्या मागे भिंतीवर कमळ खोदलेले आहे. आश्विन महिन्यातील विजयादशमीला ‘सरस्वती पूजा’ हा समारंभ मोठय़ा थाटाने केला जातो. त्या दिवशी शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांना मूळाक्षरांची दीक्षा मंदिरात दिली जाते. म्हणून ही सरस्वती या ठिकाणी ‘ज्ञान सरस्वती’ या नावाने पुजली जाते. या ठिकाणी भक्तांना स्वत: पूजा करण्याची मुभा असून देवीच्या पायापासून अर्धमंडपापर्यंत फुलांचा सडा त्या वेळी घातलेला दिसतो.

सरस्वतीचा उल्लेख नंतरच्या वेदोत्तर साहित्यातून अनेक वेळा ‘शारदा’ असा केलेला आढळतो. बाराव्या शतकातील कल्हण (बारावे शतक) या काश्मिरी ग्रंथकाराच्या मते शारदादेवीची पूजाअर्चा काश्मीरमध्ये नित्यनेमाने हेत होती. तिचे मंदिर श्रीनगरच्या आग्नेयेस तख्त- इ- सुलेमान पर्वतश्रेणीच्या समेटाजवळच्या उंच अशा एका आयताकार पठारावर बांधलेले होते. आणि त्याला ६४ पायऱ्या होत्या. त्या चौसष्ट कलांच्या द्योतक होत. ‘राजतरंगणी’त कल्हण हे मंदिर गोपादित्य राजाने बांधल्याचे सांगतो आणि शारदेच्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भक्त मधुमती व सरस्वती नदीचे दर्शन घेतात व ज्यांची कवींनी शब्दपूजा बांधली आहे, त्यांना वंदन करतात. काश्मीर हा प्रदेश प्राचीन काळापासून सरस्वतीच्या भक्तांचा प्रदेश असल्यामुळेच, या मंदिरास शारदापीठ किंवा शारदामंडळी असेही म्हणत. अल्-बीरुनी (इ. स. ९७३-१०४८) हा प्रवासी सिंधूच्या उत्तरेकडील खोऱ्यातील गिलगीट आणि लडाख या जम्मू- काश्मीर प्रदेशातील शारदेच्या अवशिष्ट मंदिराविषयीचा उल्लेख आपल्या वृत्तांतात (अल्- बीरुनीज इंडिया- सचाऊ) करतो. बिल्हण (अकरावे शतक) या काश्मिरी कवीने आपल्या ‘विक्रमांकदेवचरिता’त येथील शारदेविषयी लिहिले आहे. तो शारदेच्या हंस या वाहनाची तुलना मधुमतीच्या चकाकणाऱ्या सुवर्ण मुकुटाशी करतो. आद्य शंकराचार्यानी या शारदेचे दर्शन घेतले होते, अशी कथा आहे. विद्यमान मंदिरास शंकराचार्य मंदिर म्हणतात. त्या ठिकाणी आज शिवलिंग आहे, मात्र सरस्वती वा शारदेची मूर्ती आढळत नाही. किंवा तशा पुरातत्त्वीय खुणाही दिसत नाहीत. जोनराज या इतिहासकाराच्या मते मुसलमान नबाब झैन- उलू- अबिदिन (इ. स. १४२०-१४७०) याने एकदा शारदा मंदिराला भेट दिली होती आणि तेथील पावित्र्य नष्ट केले. सोळाव्या शतकातील अकबराच्या दरबारी असलेल्या अबुल – फज्ल (इ. स. १५५१-१६०२) या इतिहासकाराने ‘आईन – इ – अकबरी’ या त्याच्या ‘अकबरनामा’ ग्रंथाच्या तिसऱ्या भागात या ‘शारदा’ मंदिराचा उल्लेख केला आहे. त्यावरून हे मंदिर सोळाव्या शतकाअखेर अवशिष्ट वा अस्तित्वात असावे, हे निश्चित!

लंडन (इंग्लंड) मधील ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात धार (धारानगरी, मध्य प्रदेश) येथील परमार भोज (इ. स. १०००-१०५५) याने घडवून घेतलेली अभिलिखित वाग्देवी सरस्वतीची एक सुरेख मूर्ती आहे. भोज राजाने धारानगरीत अनेक मंदिरे बांधली. त्यांपैकी विद्यादेवी सरस्वतीचे मंदिर आणि भोजनशाळा (विद्यामंदिर)प्रसिद्ध होते. यातील सरस्वतीच्या मूर्तीच्या पादपीठावर पुढील मजकूर खोदला होता –

‘‘श्रीमद् भोज नरेन्दचन्द्रनगरी विद्याधरी..

वाग्देवी प्रतिमाम् विधाय जननी यस्या जितानाम् त्रयी..

फलाधिकाम् धरसरिन् मूर्ती सुभां निर्ममे इति शुभं..

सूमधार सहिर सुत मनथलेन घटितं विटिक शिवदेवेन लिखितं इति संवत १०९१’’

त्याचा थोडक्यात अर्थ असा – भोजाच्या धारानगरीत, कामना पूर्ण करणारी फलाधिकाम अशा वाग्देवीची पवित्र मूर्ती सहिर या प्रसिद्ध शिल्पीचा मुलगा मनथल याने घडविली असून त्या मूर्तीच्या पादपीठावरील लेख शिवदेव याने संवत १०९१ मध्ये कोरला आहे. म्हणजे ही मूर्ती इ. स. १०३५ मध्ये भोज राजाच्या कारकिर्दीत घडविली आहे. ही वाग्देवी चतुर्भुज असून पादपीठावर त्रिभंग आसनात ती उभी आहे. तिचे वरचे हात सुस्थितीत असून खालचे कोपरापासून तुटले आहेत. तिच्या करंडमुकुटाच्या दोन्ही बाजूंस आकाशगामी विद्याधारांच्या मूर्ती असून पायाजवळ एक सेवकाची मूर्ती आहे; तसेच एक कुंभधारी बटूची मूर्ती आहे. तिने मोजकेच अलंकार घातले असून तिच्या कानातील झुमक्याप्रमाणे लोंबणारी नाजूक कुंडले तिच्या भरगच्च अंबाडय़ाच्या पाश्र्वभूमीवर खुलून दिसतात. तिच्या गळ्यात कंठा, मोत्याचा हार दोन्ही स्तनांमधून खाली बेंबीवर आला आहे. तिचे अधोवस्त्र नक्षीदार तीन साखळ्यांच्या कमरपट्टय़ाने बांधले आहे. आणि कमरपट्टय़ाच्या अन्य साखळ्या तिच्या भरदार पुष्ट मांडय़ांवर रुळल्या आहेत. तिने पायात चार तोडे व मासळ्या घातल्या आहेत. तिच्या मुखावर शांत भाव दिसत असून विद्वत्तेचे तेज आहे. या ठिकाणी सिंह हे तिचे वाहन आहे. सांप्रत या मंदिराचे फक्त पुरातत्त्वीय अवशेष आढळतात. आणि मूर्ती तर लंडनमधील ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात विराजमान आहे. मूर्तीच्या पादपीठावरील शिलालेखामुळे या मध्यमयुगीन वाग्देवी मंदिराची स्मृती जागृत आहे.

नित्यनियमाने पूजाअर्चा होत असलेले एक सरस्वती वा ज्ञान सरस्वतीचे मंदिर आदिलाबाद जिल्ह्यात (आंध्र प्रदेश) महाराष्ट्र आंध्र प्रदेशच्या सीमेवर बासर या लहान खेडय़ात आहे. या मंदिरामुळे बासर हे तीर्थक्षेत्र व यात्रास्थान झाले आहे. ते गोदावरी नदीकाठी वसले असून श्रीमद् व्यासमुनीनी या ठिकाणी सरस्वती देवीची स्थापना केली, अशी कथा स्थानिक लोक व भक्तगण साग्ांतात. गावातील वडिलधाऱ्या मंडळींच्या मते हे मंदिर शिवकाळानंतरचे पण पेशवाईपूर्व असावे. या ठिकाणी देवीची महासरस्वती, महाकाली व महालक्ष्मी ही तीन रूपे असून गर्भगृहात सरस्वतीची स्वतंत्र पाषाणमूर्ती आहे. गर्भगृहाव्यतिरिक्त एक सभामंडप आहे. त्यात सरस्वतीच्या पादुका आणि लहान पाषाणमूर्ती आहे. तीच मूर्ती लौकिकदृष्टय़ा सर्वाना पूजेसाठी खुली असते. पादुकांसमोर प्रसंगोपात विशेषत: विजयादशमीला (दसरा) पाटी- पेन्सिलची पूजा करून ती देवाला अर्पण करण्याची अभिनव प्रथा आहे. नंतर मुलांना प्रथम विद्यालयात धाडण्याचा परंपरागत परिपाठ आहे. मंदिराच्या आठ दिशानां इंद्र, व्यास, सूर्य, वाल्मीकी, विष्णू, गणेश, शिव आदी नावांची आठ तीर्थे आहेत. बासरला व्यासपुरी असेही म्हणतात व तेथील सरस्वतीला ‘ज्ञान सरस्वती’ देवी म्हणतात. गाभाऱ्यातील मूळ मूर्ती वालुकाश्मातील असून चतुर्भुज बैठी आहे. तिच्या हातांत अनुक्रमे पुढचा उजवा व मागील डावा वीणा धरली असून मागील उजव्या हातात पात्र व माला आहे. या देवी व स्थानाविषयी कोदुमगुळ्ळे परांकुशाचार्य यांनी लिहिलेल्या ‘श्री बासर ज्ञान सरस्वती माहात्म्य’ (१९९१) या पुस्तकात त्यासंबंधी सविस्तर माहिती दिलेली आहे.

राजस्थानात पुष्कर (अजमीर जिल्हा) या क्षेत्री ब्रह्मदेवाने कार्तिक शुद्ध ११ ला यज्ञ केला होता, असे ‘पद्मपुराणा’तील कथेतून आढळते. पुष्कर तीर्थ अजमीरच्या वायव्येस  सुमारे ११ किमीवर असून एकमेव ब्रह्मावतार ठिकाण आहे. येथे जुन्या मंदिराच्या ठिकाणी इ. स. १८०२ मध्ये नवीन मंदिर बांधल्याचे कर्नल जेम्स टॉड याने आपल्या राजस्थानवरील ‘अ‍ॅनल्स अँड अँटिक्विटीज ऑफ राजस्थान’ (annals and antiquities of rajasthan) या ग्रंथात लिहिले आहे. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराजवळ गायत्री व सावित्री या त्याच्या पत्नींची गर्भगृहवजा दोन स्वतंत्र मंदिरे आहेत. याशिवाय या ठिकाणी आणखी सरस्वती, बद्रीनारायण व वराह यांची मंदिरे आहेत. ही सरस्वतीची स्वतंत्र मंदिराव्यतिरिक्त छोटी गर्भगृहसदृश मंदिरे होत.

उत्तर प्रदेशातील मथुरा हे कृष्णजन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी द्वाराकाधीशाचे भव्य मंदिर असून यमुना नदीकाठी अनेक लहान-मोठी मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांतली देव – देवतांचे दर्शन- प्रदक्षिणा म्हणजे परिक्रमा होय. या मंदिरसमूहात पश्चिमेस एक टेकाड आहे. त्यावर सरस्वतीचे एक छोटे मंदिर आहे. त्याच्या पायथ्याला एक लहान ओढा वाहतो. त्याला सरस्वती नाला म्हणतात. आणि तेथील कुंडालाही  सरस्वती कुंड म्हणतात. याशिवाय याच भागात ‘हरे राम हरे कृष्ण’ पंथाचे संस्थापक गुरुवर्य श्री प्रभुपाद यांनी बांधलेले श्रीकृष्ण – राधा यांचे भव्य मंदिर आहे.  ते इस्कॉन मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या आधुनिक मंदिरात हिंदू संप्रदायातील अनेक देवदेवतांच्या देवडय़ा आहेत. त्यांतली एका देवडीत सरस्वती देवीची एक संगमरवरी सुंदर मूर्ती आहे.

सिक्कीम येथे एक रुमटेक मठ आहे. त्या मठातील सरस्वतीच्या अप्रतिम शिल्पामुळे तो सरस्वती मठ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी देवी उत्फुल्ल कमळावर वीरासनात बसली असून कमळाची द्विदल पाकळ्यांची नक्षी फारच छान आहे. सरस्वतीची प्रभावळ कलात्मक असून त्यांतील कमळांची वर्तुळे व त्यांवरील अधरेन्मिलित कमळकलिकांचा रचनाबंध व त्या मधोमध खोदलेले कीर्तिमुख इत्यादी सर्व कलाकारी नजर रोखून धरते. देवी द्विभुज असून तिने डाव्या हातात कमळकलिका (त्याचा देठ तिच्या हातात आहे.) व उजवा अभयमुद्रेत असून त्यात अक्षमाला आहे. तिने मोजके अलंकार ल्याले असून त्यांतील कंकणे, मोत्यांचा कंठा व कर्णफुले स्पष्ट दिसतात. तिचा पद्ममुकुट व त्याच्या मोत्यांच्या माळा दोन्ही बाजूला कानावर पडल्या आहेत आणि माथ्यावर मधोमध कमळ आहे. तिने साडी नेसलेली असून तिच्या डाव्या स्तनावरून डाव्या बाहूवर लपेटलेला पदर इत्यादींतून साडीच्या चुण्या स्पष्ट दिसतात. तिच्या दोन्ही बाजूला सेवक आहेत. त्यांच्या माथ्यावर  पगडीसदृश शिरस्त्राण आहे. परस्पराकडे चोची केलेले दोन हंस तिच्या मांडीखाली खोदले आहेत. देवीच्या मुखावर प्रसन्न भाव असून स्मितहास्य आहे. तिचे डोळेसुद्धा या ठिकाणी बोलके वाटतात. कपाळावर मध्यभागी कुंकवाचा टिळा आहे. इ. स. १६ व्या शतकातील हे एक अत्यंत प्रमाणबद्ध, सडपातळ बांध्याचे लोभस शिल्प आहे.

तमिळनाडूतील तंजावर येथे दुसरा सरफोजी भोसले (इ. स.  कार. १७९८-१८३२) या कलाभिज्ञ व ग्रंथप्रेमी राजांनी ‘सरस्वती महाल ग्रंथालय’ स्थापन केले. ते सरस्वती मंदिरसम असून यातील चित्रसंग्रहात सरस्वतीचे एक अप्रतिम रंगीत चित्र आहे. या ठिकाणी सरस्वती उत्फुल्ल पद्मासनावर सव्य ललितासनात उजवा पाय खाली सोडून डावी मांडी घालून लोडाला टेकून बसली आहे. ती चतुर्भुज असून वरचा उजवा हात ज्ञानमुद्रेत अभय देत आहे. आणि खालचा उजवा वीणेच्या तारा छेडण्यात मग्न आहे. वरचा उजवा सुरांचा ताल नियंत्रित करण्यासाठी वीणेच्या दुसऱ्या टोकास खांद्याच्या वर आहे. खालच्या डाव्या हातात पोथी आहे. या ठिकाणी तिचे वाहन कोठेच नाही. तिने करंडमुकुट घातला असून तिच्या अंगावर दागिन्यांची रेलचेल आहे. तिच्या कानात कर्णफुले, गळ्यात मोत्यांचा कंठा, चंद्राहार, हातात दोन दोन तोडे, पायात तोडे व पैंजण इत्यादी अलंकार आहेत. तिच्या गळ्यातील फुलांचा हार दोन्ही स्तनांच्या बाजूने खाली लोंबताना दिसतो. देवीने नऊवारी साडी नेसली असून तांबडे पोलके घातले आहे. कपाळावर उभे कुंकू आहे. देवीच्या मागे प्रभावळीत मध्यभागी कीर्तिमुख आणि वरच्या बाजूच्या दोन कोपऱ्यांत आलीढ आसनातील गरुडांच्या प्रतिमा आहेत. ही तंजावर मराठा चित्रशैलीतील १९ व्या शतकाच्या पूर्वार्धातील सुमारे इ. स. १८२८ मधील एक अप्रतिम कलाकृती होय.

तंजावर जिल्ह्यत अचलेश्वर म्हणून एक छोटे गाव आहे. तिथे सरस्वतीचे एक चोलकालीन सरस्वती मंदिर असल्याचे ‘विद्यादेवी सरस्वती’ या  प्र. रा. आहिरराव यांच्या पुस्तकात म्हटले आहे. हे साधे पण सुंदर बांधकाम असलेले मंदिर आहे, असे ते लिहितात.

महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यत काटोळ या गावी एका जुन्या किल्ल्याचे अवशेष असून त्यात सरस्वती व चंडिका अशा दोन मध्ययुगीन शक्तिदेवतांची मंदिरे आहेत. मात्र अन्य शिवमंदिर यादवकालीन आहे. काटोळ चेन्नई- दिल्ली मार्गावरील रेल्वे स्थानक आहे. ते नागपूरपासून पश्चिमेस सुमारे ५७ किमीवर वसले आहे. येथील सरस्वती स्थानिक लोकांत शारदा या नावाने प्रसिद्ध असून या शारदा मंदिराच्या गर्भगृहात तांदळाच्या रूपातील दोन ओबडधोबड प्रतिमा आहेत. अलीकडे तिथे संगमरवरी पाषाणात घडविलेली सुबक देवीची मूर्ती प्रतिष्ठित केली असून मंदिराचे आधुनिक पद्धतीने बांधकाम केले आहे. माघ शुक्ल पंचमीस (वसंत पंचमी) येथे शारदोत्सव होतो.

ठाणे जिल्ह्यत भिवंडीच्या उत्तरेस वडवली नावाचे एक गाव आहे. तेथील वज्राबाई किंवा वज्रेश्वरी देवीच्या नावावरून त्यास वज्रेश्वरी नाव पडले आहे. वज्रेश्वरी मंदिर व जवळील गरम पाण्याचे झरे यांमुळे हे गाव प्रसिद्धीस आले आहे. तानसा नदीकाठावरील  एका टेकडीवर हे मंदिर आहे.  ते पूर्वाभिमुख असून त्याभोवती कोट आहे. पेशवाईपूर्वी हे मंदिर अगदी छोटे होते.  वसईचा किल्ला चिमाजी आप्पांनी काबीज (१७३९) केल्यानंतर त्यांनी हे मंदिर बांधले वा विस्तारित केले. त्याचा सभामंडप बडोद्याचे संस्थानिक खंडेराव यांनी तर पायऱ्या व दीपमाळा नासिकचे सावकार नानासाहेब चांदवडकर यांनी बांधली. प्रमुख गर्भगृहात पाच बाजूला सावित्री- सरस्वतीच्या मूर्ती आहेत.

देवी सरस्वती म्हणजे विद्येची अधिष्ठात्री हे आपल्याला माहीत असतं. सरस्वतीचा दुसरा संदर्भ आहे लुप्त झालेल्या नदीचा. याशिवाय देवी सरस्वतीबद्दल प्राचीन साहित्यात कोणकोणते संदर्भ आले आहेत, याची चर्चा-

अप्रशस्ता इव स्मसि

प्रशस्तिमम्ब नस्कृधि।

आम्ही अज्ञात आहोत,

आम्हास विख्यात कर हे सरस्वति!

‘या कुन्देन्दुतुषारहारधवला..’ या प्रार्थनेचे सूर प्रत्येक भारतीयाला परिचित असतात. अगदी लहानपणापासून सरस्वतीचे रूप सर्व विद्यार्थ्यांच्या समोर असते. राजा रविवर्मा या प्रख्यात चित्रकाराने रेखाटलेली, हाती वीणा घेतलेली, शुभ्रधवल हंसावर आरूढ, शुभ्रवसना, सात्त्विक वदनाची ही देवी भारतीय परंपरेत विद्यादायिनी व कलोपासकांना मार्गदर्शन करणारी देवी म्हणून सुपरिचित आहे. गणपती विसर्जनानंतर आता नवरात्राची धामधूम सुरू होईल. नऊ दिवसांत मातृशक्तीचा उदो उदो होईल, महालक्ष्मी, दुर्गा, काली यांच्या बरोबरीने महासरस्वतीचाही जागर होईल; म्हणून सरस्वती प्राचीन काळापासून याच रूपात होती का, विश्वातील प्राचीनतम ग्रंथात ऋग्वेदातही ही अशीच होती का, तिचे पूजन कसे करतात, या नावाची एक नदीही होती का असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. यांची उत्तरे शोधण्याचा हा स्वल्प प्रयास! सरस्वतीची त्रिविध रूपे ऋग्वेदापासून दिसतात; महानदी, वाग्देवी आणि देवी. या तीनही रूपांचा परामर्श घेऊ.

महानदी सरस्वती

सिंधू सरस्वतीच्या खोऱ्यातच वैदिक भारतीय संस्कृतीचा उगम व विकास झाला. ऋग्वेदात सरस्वती नदीवर तीन संपूर्ण सूक्ते आहेत (ऋग्वेद. ६.६१, ७.९५, ७.९६), शिवाय तिचे उल्लेख इतरत्र आहेतच. ‘महो अर्ण: सरस्वती’ असे म्हणत तिच्या प्रचंड जलसंचयाचे व घनगंभीर प्रवाहाचे वर्णन वेदांत येते. मार्गात येणाऱ्या पर्वतशिखरांना रोंरावणाऱ्या लाटांनी नेस्तनाबूत करीत ही डौलाने वाहते. गृत्समद ऋषी तिचे आवाहन ‘नदीतमे, अंबितमे, देवितमे’ असे करतात (२.४१.१६,१७). महाभारतकाळापासून ती हळूहळू लुप्त होऊ लागली व विसाव्या शतकापर्यंत ती लुप्तच मानण्यात आली. तिचा एक पूर्ववाही प्रवाह प्रयागक्षेत्री गंगा यमुनेला गुप्त रूपात मिळतो व त्रिवेणी संगम होतो अशी भारतीयांची श्रद्धा पूर्वापार चालत आली आहे. याचा शोध घेतला असता, भूगर्भात खरोखरीच असे अनेक प्रवाह आढळले व सरस्वतीच्या शोधमोहिमेला आरंभ झाला. अलीकडे पुण्याच्या डेक्कन विद्यापीठाने हरयाणा राज्यातील राखीगढ इथे उत्खनन केले तेव्हा शुष्क नदीपात्रात अनेक प्रागतिहासिक वस्तू, मानवी सांगाडे सापडले, ज्यांचा काळ इ.स. पूर्व पाच ते आठ हजार वर्षे इतका मागे जातो. एकेकाळी समृद्ध वैदिक संस्कृती इथे नांदत होती हे यावरून सिद्ध होते. सरस्वती शोध संस्थानच्या मतानुसार यमुना सरस्वती क्षेत्र, सरस्वती साबरमती क्षेत्र व राजस्थान साबरमती विभागात उत्खनन केल्यास १३०० कि.मी लांबीची सरस्वती नदी पुन्हा प्रवाहीत होऊ शकते. कुरुक्षेत्र हा प्रदेश पृथ्वीची नाभी होती. सरस्वती ही अत्यंत वेगवती नदी असून सप्त नद्यांची भगिनी होती असा उल्लेख ऋग्वेदात आढळतो. दृषद्वती, शुतुद्री (सतलज), चन्द्रभागा (चिनाब), विपाट् (व्यास- बियास), इरावती (रावी) या नद्यांनी व अशा अनेक लहानमोठय़ा प्रवाहांनी हीस समृद्ध केले. खरोखरीच ही ‘सिन्धुमाता’ होती. हिच्या तीरावर वेदांतील पंचजनांचा विकास व उत्कर्ष झाला. ऋग्वेदकालीन राज्यकत्रे- मग ते भरतवंशीय असोत, कुरुवंशीय, मत्स्यवंशीय, पांचाल असोत अथवा ययातीचे पुत्र, सर्वानी हिच्या तीरावर यज्ञयाग केले, देवांसाठी आहुती दिल्या व आपले राज्य सुस्थिर केले. भरतकुळाचे आधीचे उपाध्याय होते, ख्यातकीर्त ऋषी विश्वामित्र. नंतर वसिष्ठांनी हे पद भूषवले व दहा राजांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या सुदासाला इंद्र व वरुणांच्या मदतीने युद्धात विजय मिळवून दिला. तत्कालीन शासक होते दिवोदास व सुदासासारखे लढवय्ये राजे. या भरतवंशीय राजांमुळेच हिला भारती हे नाव पडले. सरस्वतीच्या खोऱ्यातील सुपीक प्रदेशात प्राचीन वैदिक संस्कृती बहरू लागली. मग जमिनीच्या कसाच्या जोडीने मानवी सुफलनाशीही सरस्वतीचे नाते जोडले गेले. गर्भधारणेसाठी व सुरक्षित प्रसूतीसाठी सरस्वतीची प्रार्थना केली आहे (ऋ. १०.१८४.२) पíशयन संस्कृतीतही सरस्वती अनाहिता या नावाने आढळते. आबान यश्त या जलदेवतेच्या स्तुतीत अनाहिता ही गर्भधारणेसाठी व सुरक्षित प्रजननासाठी उपास्य असल्याचे सांगितले आहे. मुळात निरंतर वाहणारा नदीचा प्रवाह हाच वंशसातत्याचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच प्राचीन संस्कृतीत नद्या या जीवनदायिनी, पुत्रसंदायिनी मानल्या जातात. सरस्वतीच्या तीरावर अनेक तीर्थक्षेत्रे विकसित झाली. महाभारतात युद्धाच्या समयी बलरामाने सरस्वतीच्या काठाने तीर्थयात्रा केली त्याचे वर्णन आहे. दक्षाच्या शापाने चंद्राचा क्षय होऊ लागला तेव्हा त्याने सरस्वतीक्षेत्री स्नान केले व तो रोगमुक्त झाला, तसेच शंकराने ब्रह्महत्येचे पाप नष्ट करण्यासाठी कुरुक्षेत्री स्नान केले असे अनेकविध प्रसंग पुराणात क्षेत्रमाहात्म्य विशद करताना आले आहेत.

14-sarsvati-lp
सरस्वती नदी काही भौगोलिक कारणांमुळे लुप्त झाली असली तरी पुराणांत विविध कथांमधून या लुप्त होण्याची कारणमीमांसा केलेली दिसते. पद्मपुराणात अशी कथा आहे की जेव्हा और्व ऋषीने निर्माण केलेला अग्नी सर्व विश्व ग्रासू लागला, तेव्हा ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून सरस्वतीने नदीरूप घेतले व एका कलशात तो वडवाग्नी ठेवून ती पश्चिम समुद्राकडे निघाली, पापी जनांचा स्पर्श टाळण्यासाठी ती जमिनीखालून वाहू लागली, अग्नीचा ताप अस झाला की भूपृष्ठावर येऊ लागली. वामनपुराणात जरा वेगळ्या ढंगाने हा कथाभाग येतो. उत्तंक ऋषीच्या आश्रमाजवळ प्लक्ष वृक्षापासून सरस्वती उत्पन्न झाली. कुठे जायचे हे न कळल्यामुळे ती कुंठित झाली, तेव्हा मरकडेय ऋषींच्या मागोमाग जात ती प्रथम कुरुक्षेत्री गेली व नंतर दक्षिण दिशेस वाहत गेली. सरस्वती आणि दृषद्वती नद्यांच्या मधील भूभागाला मध्यदेश म्हणजेच कुरुक्षेत्र अथवा ब्रह्मावर्त असे संबोधतात. समुद्रात तो वडवानल विसर्जति करताना ती हारिणी, कपिला, नंदा, अशा विविध प्रवाहांनी वाहिली असेही आढळ्ते. या सरस्वतीच्या उपनद्या असाव्यात. महाभारतातील वृत्तांतानुसार सरस्वती एक अप्सरा होती, तीने पुरूरव्याशी संग केला व सरस्वान् नावाच्या पुत्राला जन्म दिला म्हणून ब्रह्मदेवाने तिला नदी होण्याचा शाप दिला. अप्सरा व नद्या यांचे समीकरण किंवा तादात्म्य हा पुराणकथाशास्त्रातील एक स्वतंत्र विषय आहे. ब्रह्मांडपुराणातील कथेनुसार अग्नीचा १६ नद्यांशी विवाह झाला, त्यातील एक सरस्वती होय. शिवाने त्या नद्यांना ‘धिष्ण्या’ असे नाव दिले. वैदिक कोशात धिष्ण्याचे दोन अर्थ दिले आहेत; यज्ञप्रदेश व तात्पर्य धारण करणारी वाणी. या दोन्ही अर्थानी सरस्वती समृद्ध आहे. सरस्वतीच्या लुप्त होण्याबरोबर तिच्या तीरावर राहणारे सारस्वत लोक हळूहळू स्थलांतर करू लागले. पंजाब, सिंध, राजस्थान, महाराष्ट्र तसेच गोव्यापर्यंत पश्चिम समुद्राच्या काठाकाठाने सारस्वत जनांनी वसाहती केल्या. परंपरेने उत्तरेतील ब्राह्मणांना गौड व दक्षिणेतील ब्राह्मणांना द्रविड म्हणत असत. सारस्वत लोक उत्तरेतून स्थलांतरित होऊन दक्षिणेकडे सरकले तेव्हा, तेथील ब्राह्मणांनी त्यांना गौड सारस्वत म्हणायला सुरुवात केली. हल्ली गौड सारस्वत या नावाने प्रसिद्ध असलेला समाज मूळचा सरस्वती नदीतीरावरील जनसमूह आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातूनही यावर अधिक संशोधन करता येईल.

वैदिक ऋषी कवष ऐलूष याचा सरस्वतीशी घनिष्ठ संबंध आहे. इलूषा नावाच्या दासीचा पुत्र म्हणून अंगिरसांनी त्याची हेटाळणी केली, तेव्हा या प्रज्ञावंत कवीने सरस्वतीचे सूक्त गायले (ऋ. १०.३०). तहानेने तळमळणाऱ्या कवषाजवळ ती वाहात आली, ते क्षेत्र ‘परिसारक’ नावाने ख्यात झाले अशी आख्यायिका ऐतरेय ब्राह्मणात आहे. नदीरूपात ही अन्नदायिनी म्हणूनच ‘वाजेभि वाजिनीवती’ (वाज म्हणजे अन्न व अन्नाच्या योगे येणारे बळ) अशी तिची स्तुती केली गेली. मानवी संस्कृतीच्या समृद्धीचे प्रथम गमक म्हणजे त्याची वाणी. बहिणाबाई म्हणतात, माझी माय सरसोती माला शिकवते बोली. नदीच्या खळाळणाऱ्या प्रवाहात तीरावर केलेल्या यज्ञातील मंत्रांचे स्वर मिसळत गेले व पाहता पाहता सरस्वती नदी वाणीच्या रूपात विकसित होऊ लागली व कोणताही भेदभाव न बाळगता सानथोरांच्या जिव्हाग्री विराजमान झाली.

वाग्देवी सरस्वती: ऋग्वेदात ‘तिस्रो देवी’ या नावाने भारती, इळा व सरस्वती यांचा संयुक्त उल्लेख आढळतो (ऋ. ७.२.८). यातील इळा हा शब्द अन्नवाचक असल्याने व सुपीकतेशी जोडल्याने नदीवाचक आहे, भारती वाणीशी संबंधित आहे तर सरस्वती देवीरूपाशी. निघंटू या ग्रंथात वाक् या शब्दाचे ५७ पर्यायी शब्द दिले आहेत त्यांत इळा, भारती, सरस्वती हे शब्द आहेत. माध्यमिका वाक् म्हणजे अंतरिक्षातील मेघगर्जना / वाणी या रूपात सरस्वतीचा निर्देश वैदिक वाङ्मयात तसेच निरुक्तात केला आहे. देवांना सोम हवा होता तेव्हा सोमाचे अधिकृत अधिकारी गंधर्व यांच्याशी वाग् सरस्वतीने व्यवहार केला. वाणीच्या बदल्यात देवांना सोम मिळाला, परंतु वाणीशिवाय देव मूक झाले, तेव्हा वाणी गुप्तपणे त्यांच्याकडे आली. ऐतरेय ब्राह्मणातील कथाभागानुसार सोमक्रयणाच्या समयी म्हणूनच उपांशुवचन (हळू पुटपुटणे) अभिप्रेत असते. विधींशी पुराकथांची सांगड अशा प्रकारे घातली जाते. ऋग्वेदात अंभृणऋषीची कन्या म्हणून वागाम्भृणी व तिचे सूक्त येते (१०.१२५) दैवी वाक् म्हणते की मीच रुद्र, वसू, आदित्य, वसर्व देवांना प्रेरणा देते, त्यांना धारण करते. मी या संपूर्ण विश्वाला व्यापून राहते, मी लोकांना एकत्र आणते, उपासकांना यज्ञफल देते, साक्षात्कारी जनांना दर्शन देते त्यांच्यावर शासन करते. खरंच वाणी नसती, भाषेसारखे प्रभावी माध्यम नसते तर आपण सर्व कसे एकत्र आलो असतो? भाषा लोकांना एकत्र आणू शकते आणि दूरही लोटू शकते. शस्त्राविनाही सामथ्र्यशील वाणीमुळे काय घडले हे सांगताना कुंभकर्णाची कथा पाहावी. कुंभकर्णाने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले व वर मागणार एवढय़ात सरस्वती त्याच्या जिव्हाग्री बसली. त्यामुळे ‘निर्देवत्व’ (देवांशिवाय मोठेपण) या शब्दाऐवजी ‘निद्रावत्व’ असा शब्द त्याच्या मुखातून बाहेर आला व परिणामस्वरूप तो अखंड निद्राधीन झाला. मराठय़ांच्या इतिहासात ‘ध’ चा ‘मा’ करणारी आनंदीबाई सरस्वतीच्या दृश्य रूपात (अक्षरलिपीत) हस्तक्षेप करणारी खलनायिका ठरली. रामाचे अवतारकार्य पूर्ण करण्यासाठी साक्षात सरस्वतीने मंथरेच्या मुखी आश्रय घेतला व तिच्या सल्ल्यानुसार कैकेयीने वर मागितले अशीही कथा आहे. साक्षर हा शब्द उलट वाचला तर राक्षस होतो हे अर्थाच्या दृष्टीनेही किती अन्वर्थक आहे नाही का! वाणीचा दुरुपयोग करू नये, नाही तर ती वक्त्यावरच उलटते हे सर्व धर्मात एकमुखाने सांगितले आहे.

15-sarsvati-lp
बृहदारण्यकोपनिषदात वाणी धेनूच्या रूपात येते. स्वाहा, स्वधा, वषट् व हन्त हे तिचे चार स्तन आहेत. पकी स्वाहा व वषट् यांचे दोहन देव करतात, स्वधेचे पितर आणि हन्तचे मनुष्यमात्र! सरस्वती वाग्देवीच्या रूपात चतुर्वधि आहे, ‘नमूं शारदा मूळ चत्वार वाचा’; परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी. शब्दाची भागवतातील व्याख्या आहे, अर्थाश्रयत्वंशब्दस्य द्र.ष्टुìलगत्वमेव च। तन्मात्रत्वं च नभसो लक्षणं कवयो विदु-आकाशाचा सूक्ष्म अंश घेऊन अर्थ व्यक्त करणारी वाणी वक्त्याचा, चतन्याचा निर्देश करते. वैखरी मुखावाटे प्रसृत होते, स्वर व्यंजनांचे लेणे लेवून येते. शांतिपर्वातील वृत्तानुसार एकदा याज्ञवल्क्यांनी चिंतन केले तेव्हा स्वरव्यंजनांचे दागिने घालून ओंकारध्वनी करीत सरस्वती अवतरली. वैखरी हे वाणीचे प्रकटरूप आहे, हेच रूप सर्वाना ठाऊक आहे, इतर तीन रूपे गुप्त असतात व तपचिंतनानेच साध्य होतात. मानवाच्या स्थूल, सूक्ष्म, कारणशरीराशी वैखरी क्रियाशक्ती, मध्यमा ज्ञानशक्ती तर पश्यन्ती (पाहणारी, द्रष्टी) इच्छाशक्ती या दृष्टीने संबंधित आहेत. परावाणी केवळ योगीजनगम्य आहे व तिथे शब्द आणि अर्थ अविभक्त असतात. शिवपार्वतीचे अद्वैत ‘वागर्थाविव संपृक्तौ’ असे कालिदास म्हणतो, तेव्हा हेच अभिप्रेत आहे. स्कंदपुराणात अंबुवाची राजाची कथा आहे. हा मूक होता, याने हाटकेश्वरी सरस्वतीत स्नान केले, तत्क्षणी त्यास वाचा प्राप्त झाली. मग त्याने तीरावरील माती घेऊन तिची पाíथव मूर्ती केली. तीर्थमाहात्म्य, वाचाप्राप्ती व देवीस्वरूप ही तिन्ही रूपे इथे दिसतात.

सरस्वती देवी

अंबुवाची राजाने सरस्वतीची चतुर्हस्त मूर्ती केली. तिचे चार हात सर्वव्यापित्व दर्शवितात. दोन उजव्या हातांत कमळ व अक्षमाला, तर दोन वामहस्तात पुस्तक व कमंडलू अशी मूर्ती सजली. कमळ हे सृजनाचे प्रतीक, अक्षमाला एकाग्रतेचे सूक्ष्म प्रतीक, पुस्तक हे ज्ञानप्राप्तीचे स्थूल साधन तर कमंडलू हे ज्ञानामृताचे प्रतीक मानले जाते. जेव्हा गणपतीप्रमाणे सरस्वती ज्ञानासोबत कलांची अधिष्ठात्री मानली जाऊ लागली, तेव्हा तिच्या हाती वीणा आली, व ती संगीताचे, कलांचे प्रतीक झाली. अश्वतर राजा या सरस्वतीच्या पूजनाने संगीतात पारंगत झाला असे मरकडेय पुराणात आहे. ज्ञानस्वरूप असल्यामुळे शुभ्र हंस तिचे वाहन समजले जाते. कलांची देवी म्हणून मयूर वाहन आहे तर सर्जकशक्ती म्हणून ती कमलासना आहे. द्विभुजा सरस्वती विष्णुपत्नी, विष्णुमाया म्हणून प्राचीन काळापासून विख्यात होती. विष्णूने प्रकृतिमुखर (स्वभावत: अत्यंत बडबडी) सरस्वती व चंचल लक्ष्मीला कंटाळून लाकडात प्रवेश केला (दारुभूतो मुरारि:) असे एक मजेदार सुभाषित आहे. मध्ययुगात ती चतुर्हस्ता झाली. मुळात ती ब्रह्मदेवाची कन्या. तिचे अप्रतिम लावण्य पाहून सृष्टिकर्ता तिच्यावर भाळला व त्याने तिचा पत्नीत्वाने स्वीकार केला. सर्जनाच्या प्रक्रियेत नात्यांचा असा गुंता सर्व पुराकथांचा एक अविभाज्य घटक आहे. ब्रह्मदेव, विष्णू व शिवाचे एकत्रित तेज म्हणजे सरस्वती होय. म्हणूनच तिला त्रिकला असे म्हणतात. उत्तरेत विद्याप्रदा शारदा आणि दक्षिणेत शिवशक्तीच्या रूपात तिचे पूजन केले जाते. शारदीय नवरात्रातील शेवटचे तीन दिवस, सप्तमी ते नवमी महासरस्वतीचे मानले जातात. देवीभागवत आणि मरकडेय पुराणात देवीमाहात्म्यात तिला नीलसरस्वती असे म्हणून तिचे कालीशी तादात्म्य सांगितले आहे. बौद्धांनीही तारा देवीचे रौद्ररूप म्हणून नीलसरस्वतीचे वर्णन केले आहे. या रूपात ती दैत्यसंहार करते. दुष्टांचे निर्दालन व सुष्टांचे रक्षण हे दुग्रेप्रमाणेच तिचे कर्तव्य आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत महेश्वरी म्हणून पहिले तीन दिवस सर्जकशक्तीचे आवाहन, नंतरचे तीन दिवस सौंदर्य व संपत्तीचे प्रतीक महालक्ष्मीचे स्तवन आणि शेवटचे तीन दिवस परम गुह्य़ज्ञानस्वरूप ब्रह्मविद्य्ोचे सरस्वतीचे ध्यान असा उपासनाविधी आहे. देवांच्या त्रिमूर्तीप्रमाणे देवीची त्रिमूर्ती अशा प्रकारे सिद्ध झाली. वैश्विक मातृशक्तीचे हे त्रिविध आविष्कार खूप लोभस आहेत. मत्स्यपुराणात सरस्वती, सावित्री व गायत्री या तिघी ब्रह्मदेवाच्या पत्नी असे सांगून त्यांचे ऐक्य प्रतिपादित केले आहे. ब्रह्मदेवाच्या शुद्ध सत्त्वगुणापासून हिची निर्मिती झाली म्हणून् ही विमलेन्दुधवला आहे. दुर्गासप्तशतीत हिची विविध नावे येतात, महाविद्या महावाणी भारती वाक् सरस्वती। आर्या ब्राह्मी कामधेनुर्वेदगर्भा च धीश्वरी । माघ शुद्ध पंचमीला म्हणजेच वसंतपंचमीला हिचे विधिवत् पूजन करून विद्यारंभ करण्याचा प्रघात आहे. महाराष्ट्रात घरोघरी काढली जाणारी आकडय़ांची सरस्वती हे एक यंत्र आहे. त्यातून उद्भवणारे त्रिकोण श्रीयंत्राप्रमाणे चतन्याचे, ऊर्जेचे व गुह्य़ज्ञानाचे गाभारे आहेत. ही रांगोळी अमूर्ताकडे नेणारी सोपी व मूर्त पायवाट म्हणता येईल. यंत्राच्या जोडीने तंत्रशास्त्रही विकसित झाले व बीजमंत्रांनी ध्यान होऊ लागले.

बौद्ध परंपरेत ही वज्रवीणा, आर्यसरस्वती, वज्रसरस्वती या नावांनी तर जैन परंपरेत श्रुतदेवी म्हणून प्रसिद्ध आहे. भारताबाहेर, आशियाई देशांत सरस्वतीची विविध रूपे व मूर्ती आढळतात. बहुतेक मूर्तीत सरस्वती वीणाधारिणी दाखवली जाते. बुद्धीची ग्रीक देवता अथेना किंवा रोमन मिनव्‍‌र्हा सरस्वतीचीच पाश्चात्त्य रूपे म्हणता येतील, कारण याही विद्या, वाणी व कलादायिनी मानल्या जातात. बुद्धिप्रदा शारदा हे सरस्वतीचे सर्वमान्य विशेषण! शरद् ऋतूशी संबंधित, काश्मीरमधील शारदापीठाशी संलग्न म्हणून शारदा. शिवाय ही सार+दा, श्रुतींचे सार देणारी आहे. ही केवळ सरस्+ वती, जलाशयांनी युक्त नाही, तर सार+स्व+ वती म्हणजे आत्मज्ञानाचे सारसर्वस्व देणारी चिद्घनचपला आत्मशक्ती आहे. ही ‘अभिनव वाग्विलासिनी चातुर्यार्थकलाकामिनी विश्वमोहिनी’ आहे यात काय संशय!

Vajreshwari and Hingula Devi story in Marathi

वज्रेश्वरी आणि हिंगुळा
हिंगुळा देवीचे बलुचिस्तान येथील हिंगलज (पाकिस्तान) येथे मूळ स्थान आहे. गुप्तरूपाने राहत असलेल्या शंकरास पार्वतीने हिंगुळा नदीच्या ठिकाणी शोधून काढले.


हिंगुळा देवीचे बलुचिस्तान येथील हिंगलज (पाकिस्तान) येथे मूळ स्थान आहे. गुप्तरूपाने राहत असलेल्या शंकरास पार्वतीने हिंगुळा नदीच्या ठिकाणी शोधून काढले. यामुळे हिंगुळा क्षेत्राला हे नाव प्राप्त झाले. या ठिकाणी सतीचे ब्रह्मरंध्र गळून पडले होते. म्हणून हे एक शक्तिपीठ म्हणून मानले जाते.

वज्रेश्वरी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची देवी. या देवीचे स्थान पालघर जिल्ह्य़ामधील वसई येथील वडवली या गावात आहे. हा परिसर वज्रेश्वरी या नावानेच प्रसिद्ध आहे. देवीचे मंदिर उल्हास नदीच्या तीरावरच्या टेकडीवर आहे. या देवतेस वज्रेश्वरी नाव कसे प्राप्त झाले यासंबंधी कथा दिगंबर स्वामी रचित ‘वज्रेश्वरी माहात्म्य’ या पोथीत सापडते.
पोथीनुसार प्राचीनकाळी वज्रेश्वरी भागात घनदाट जंगल होते. त्या वेळी तानसा नदीच्या भागात उग्रसुर नावे एक दैत्य राज्य करीत होता. या दैत्यास सिंहमार आणि कलिकाळ हे पराक्रमी पुत्र होते. शक्तीने धुंद झालेले हे असुर सर्वत्र धुमाकूळ घालू लागले आणि त्यामुळे ऋषीमुनींच्या यज्ञयागादी कर्मात त्यांचा त्रास होऊ लागला. वारंवार विघ्न आणणाऱ्या या दैत्यांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी या ऋषीमुनींनी देवीची कृपा संपादन करण्याचे ठरवले. त्यांनी यज्ञास आरंभ केला. या यज्ञाचे ऋत्विज वशिष्ठमुनी होते. यज्ञ समारंभात विविध देव-देवतांचे मंत्रोच्चारांनी आवाहन करण्यात आले. सर्व देवतांना हविर्भाग मिळाला. मात्र इंद्रास आवाहन करण्याचे राहून गेले. वशिष्ठांनी हे हेतुत: परस्पर केले असे समजून क्रोधित झालेल्या इंद्राने त्यांच्यावर वज्र प्रहार केला.
इंद्र झाला कोपायमान
मम नामें का न दिले हवन?
आतां निश्चये मी विंध्वसीन
हा त्रिचांडी याग
वसिष्ठावरी सोडिता वज्र
पार्वतीने गिळिले समग्र
म्हणोनि वज्रेश्वरी नाम
पार्वतीही पावली

वसिष्ठांवर फेकलेले वज्र पार्वतीने गिळले म्हणून तीस ‘वज्रेश्वरी’ हे नाम प्राप्त झाले. वज्रेश्वरीचे सांप्रत असलेले मंदिर पेशवेकालीन असून पोर्तुगीजांवर जय मिळवल्यावर चिमाजी अप्पा यांनी सुभेदार शंकराजी केशव यांच्यातर्फे जीर्णोद्धार केला. वरील माहात्म्यामधील कथा पाहिल्यावर मुंबादेवी माहात्म्याची आठवण होते. येथे ही देवी दैत्याचा नाश करण्याच्या हेतूने पृथ्वीतलावर येते आणि त्याचा नाश करते. वज्रेश्वरीमाहात्म्य हे पेशवेकाळात वसईच्या मोहिमेनंतर कधीतरी लिहिले गेले असावे. वज्रेश्वरी ही दैवज्ञ ब्राह्मण (सोनार), पाचकळशी, सुतार आणि वाडवळ, सूर्यवंशी क्षत्रिय इत्यादी ज्ञातींची कुलस्वामिनी आहे.
नवनाथांच्या पोथीमधील आठव्या अध्यायात वज्रेश्वरी आणि हिंगुळजा या देवींचे उल्लेख आढळतात. या पोथीनुसार गोरक्षनाथ आणि या दोन्ही देवींमध्ये युद्ध झालेले दिसते. या युद्धात गोरक्षनाथांचा जय होतो आणि हरलेल्या या दोन्ही देवींना गोरक्षनाथ येथेच कायम राहण्याचा आदेश देतत. हिंगुळा देवीचे बलुचिस्तान येथील हिंगलज (पाकिस्तान) येथे मूळ स्थान आहे. गुप्तरूपाने राहत असलेल्या शंकरास पार्वतीने हिंगुळा नदीच्या ठिकाणी शोधून काढले. यामुळे हिंगुळा क्षेत्राला हे नाव प्राप्त झाले. येथील देवी अष्टभुजा असावी, असे अनुमान अनेक संशोधक आणि तज्ज्ञांचा आहे. या ठिकाणी सतीचे ब्रह्मरंध्र गळून पडले होते. म्हणून हे एक शक्तिपीठ म्हणून मानले जाते.
हिंगुळा पुराणात या देवीची माहिती दिली आहे. रावणावर विजय मिळवून आल्यावर तो या देवीचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. त्या वेळी देवीच्या दूतांबरोबर रामाचे युद्ध झाले व त्यास माघार घ्यावी लागली. मग त्याने देवीची प्रार्थना केली आणि मग देवीने त्यास दर्शन दिले. राम ज्या मार्गाने या देवीचे दर्शन घेण्यासाठी गेला, त्या मार्गावर अनेक तीर्थे उत्पन्न झाली. या देवीचे भारतात बरेच भक्त आहेत. मुसलमान बंधू हिला नानीबिबी म्हणून भजतात.
चौल येथील हिंगुळा देवी ही बौद्ध विहारात पाहायला मिळते. बौद्ध विहारात एका हिंदू देवतेचे स्थान कसे असू शकते? कोणत्याही धर्माचे पवित्र ठिकाण असो, त्या ठिकाणी इतर दैवतांची स्थापना केल्याने त्या दैवताचे पावित्र्य काही कमी होत नाही. ते ठिकाण सदैव पवित्र असते. याचे उदाहरण म्हणजे कार्ले येथील एकवीरा देवी होय. कार्ले येथे बौद्ध विहार व भारतामधील सर्वात मोठा चैत्य आहे. या लेणींसमोर या देवीचे एक लहानसे मंदिर पाहावयास मिळते. सह्य़ाद्रीखंडानुसार अदितीने तप केल्यावर शंकराने तिच्यावर प्रसन्न होऊन तुझा अवतार भूतलावर इश्वाकू वंशातील रेणुराजाच्या घरी होईल असे म्हटले. तसेच तुझे मूळ नाव रेणुका असे असेल व तू भूतलावर एकवीरा या नावाने प्रसिद्ध होऊन तुला पाच पुत्र होतील, हेदेखील सांगितले. दुसऱ्या एका समजुतीप्रमाणे रेणुकेच्या पोटी परशुराम हा एकच वीरपुत्र जन्म पावला म्हणून तिला एकवीरा म्हणतात. ही देवी कोळी, कासार, पाचकळशी, सुतार आणि वाडवळ, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, इत्यादी ज्ञातीमात्रांची देवी आहे.
या देवीचा अग्रपूजेचा मान कोळी समाजाचा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक रामोशी कोळी यांनी आपले मूळ गाव सोडले आणि स्वराज्याच्या स्थापनेसाठी येथे येऊन हातभार लावला. या कोळी समाजाच्या स्थलांतरामुळे या देवीचेही स्थलांतर झाले असावे.

Amaravatichi Ambadevi story in marathi

महती देवीची : अमरावतीची अंबादेवी

येथील अंबादेवी मंदिराला पुरातन इतिहास आहे. या मंदिराचा संबंध रुक्मिणी हरणाशी जोडला जातो. राज्यातीलच नव्हे तर, इतर प्रांतातील भक्तांची मांदियाळी नवरात्रोत्सवात पहायला मिळते. या मंदिराजवळच एकवीरा देवीचे मंदिर आहे. या दोन्ही मंदिरांना आता नवा साज चढला आहे.
या मंदिराचे अस्तित्व हजार वर्षांपूवीचे असल्याची अधिकृत नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यभिषेकाची निमंत्रण पत्रिका अंबादेवीला पाठवल्याचे  इतिहासात नमूद आहे. अंबामातेचे प्राचीन मंदिराचा कळस उंचावर होता तेव्हा तो स्पष्ट दिसायचा.  हे मंदिर जुन्या वस्तीच्या परकोटाला लागून आहे. अंबादेवीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मूर्ती वाळूकेची असून अतिशय पुरातन आहे.
मोगलांनी १५०० च्या कालखंडात वऱ्हाडावर कब्जा केला तेव्हा अनेक नगरांची लुटालूट, नासधूस केली. अनेक हिंदू मंदिरेही उद्ध्वस्त केली. त्यात अमरावतीच्या अंबादेवी मंदिराचा समावेश होता. हे मंदिर उद्ध्वस्त झाल्यानंतरही आतील गाभारा व अंबेची मूर्ती त्यातून सुखरूप राहिली असावी. त्यानंतर १६६० च्या सुमारास श्री जनार्दन स्वामींनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
अनेक वर्षे हे मंदिर लहानशा ओटय़ावर चार लाकडी खांबाचा आधार घेऊन उभे होते. जनार्दन स्वामींच्या पुढाकाराने काही नागरिकांच्या मदतीने पुढे या मंदिराचा कायापालट होत गेला. अहल्यादेवी होळकरांनीही या मंदिराच्या उभारणीत योगदान दिल्याचे पुरावे मिळतात. अंबादेवीची स्वयंभू मूर्ती काळ्या रंगाच्या वाळूका पाषाणाची आहे. ही मूर्ती पूर्णाकृती व आसनस्थ आहे. भक्तांच्या मनोकामना निश्चितपणे पूर्ण होते, अशी श्रद्धा दर्शनार्थी व्यक्त करतात. मंदिराच्या बांधकामात दक्षिण शिल्पकलेचा प्रभाव दिसतो. मंदिराच्या उत्तर बाजूला मारुती व दुर्गादेवीचे मंदिर आहे. दर मंगळवारी अंबादेवीच्या मुर्तीवर सुवर्णखचित दागिने चढवले जातात. मुखवटा सुवर्णाने मढवलेला असतो. दागिन्यांमध्ये सोन्याची नथ, बिंदी, बाजूबंद, गळ्यातील एकदाणी, कमरपट्टा, बांगडय़ा आदींचा साज चढतो.  दागिन्यांची आरास लक्ष वेधून घेते. अनेक जाती-धर्माचे व पंथाचे लोक या मंदिरात दर्शनाला येतात.
अंबादेवी मंदिराच्या जवळच एकवीरा देवीचे मंदिर आहे. या मंदिराचा अलीकडेच विस्तार आणि सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. मंदिराचा कळस सुवर्णाचा असून शिखरही कलाकुसरीचे अप्रतिम दर्शन घडवते. एकवीरादेवीचे मंदिर जनार्दनस्वामी यांनी उभारल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो.  एकवीरा देवीच्या गाभारा कोरीव व दगडाने बांधलेला आहे. पुरातन नमुना यात स्पष्ट दिसून येतो. देवालय लाकडी चौकटीवर बांधलेले आहे. एकवीरा व अंबादेवीच्या मधोमध असलेल्या नाल्यावर पूल उभारण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही मंदिरात जाऊन सहज दर्शन घेता येते.   

Vidarbhateel devichi Mandire

महाराष्ट्रात असलेली देवीची साडेतीन पीठे सगळ्यांना परिचित आहेत. पण त्यापलीकडेही देवीची विविध स्थाने असून लोकमानसात त्यांना महत्त्व आहे. विदर्भातील अशा काही स्थानांची माहिती-

आताच्या अमरावती शहराच्या नावाचा उच्चार एकेकाळी ‘उमरावती’ असा होता. अमरावती येथील भाजीबाजार विभागात श्री सोमेश्वर मंदिराशेजारी रुखबदेव (ऋषभदेव) संस्थानातील म्हणजेच आजच्या आदिनाथ दिगंबर मंदिरातील तळघरात श्री आदिनाथ रुखबदेव यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. त्या मूर्तीच्या बठकीवर लेख कोरलेला आहे. त्यावरून त्यांची स्थापना संवत ११५३ साली म्हणजेच इ. सनाच्या ११व्या शतकाच्या अखेरच्या दशकात सुमारे इ.स. १०९७ साली झाली. यावरून त्यांचे प्राचीनत्व लक्षात येते. या मूर्ती स्थापन होण्यापूर्वी २५ ते ३० वर्षे अमरावतीजवळील एलिचपूरला (अचलपूर) ‘ईल’ नावाचा जैन धर्मीय राजा राज्य करीत होता. त्याने इ.स. १०५८ मध्ये एलिचपूर येथे आपले राज्य स्थापन केले. या पुराव्यावरून हे लक्षात येते की, ११ व्या शतकापासून अमरावती शहर अस्तित्वात होते. श्री गोिवदप्रभूंच्या (महानुभाव पंथाचे प्रवर्तक) चरित्रात १३ व्या शतकात ते उंबरावतीस आले होते असा उल्लेख आढळतो.

अमरावतीपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेले आजचे कौंडिण्यपूर म्हणजे पुरातन कुंडीनपूर ही भीष्मक राजाची राजधानी होती. वर्धा नदीच्या काठावर असलेले विदर्भा नगरी ऊर्फ कुंडिनपूर येथे ‘विदर्भ’ राजाने आपले राज्य स्थापन केले. भोज शाखेतील यदुवंशातील विदर्भ नावाच्या राजाने कुंडिनपूर येथे आपली राजधानी व राज्य स्थापन केले. कुंडिनपूर या पुरातन राजधानीचा घेर २६ कोसांचा (सुमारे ६५ मल) होता. याच कुंडिनपूरच्या वेशीवर नगराच्या बाहेर श्री अंबादेवीचे मंदिर असून येथूनच राजा भीष्मकाची मुलगी राजकन्या रुक्मिणीचे हरण श्रीकृष्णाने केले अशी आख्यायिका आहे. त्यावेळी झालेल्या युद्धात रुक्मिणीचा भाऊ रुक्मि याचा श्रीकृष्णाने पराजय केला. त्यानंतर तो म्हणजेच रुक्मि कुंडिनपूरला परत गेला नाही. तर त्याने अमरावतीच्या पश्चिमेला १५-१६ मलावर भोजकट नावाचे नवीन नगर बसवून तेथे आपली राजधानी उभी केली. त्यामुळे त्यानंतर तो भाग भोजकट राष्ट्रक म्हणून ओळखला जाऊ लागला. हेच आजचे भातकुली गाव होय.

श्री अंबादेवी संस्थान

अमरावती शहराच्या मध्यभागी, अंबागेटपासून एक किलोमीटर अंतरावर श्री अंबादेवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ अंबानाला असून नाल्याच्या पलीकडच्या तीरावर श्री एकवीरा देवीचे मंदिर आहे. एकवीरा देवीच्या मंदिरास लागूनच जगप्रसिद्ध अशा ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ’ या संस्थेचा बराच मोठा शैक्षणिक परिसर आहे. श्री अंबादेवीचे मंदिर अती प्राचीन असून स्वयंभू मानले जाते. ही मूर्ती वालुकामय पाषाणाची असून पद्मासनात स्थित आहे. एक हजार ते १५०० वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना झाली असावी असे संदर्भ आढळतात. रुक्मिणी हरणाशीही याचा संबंध जोडण्यात येतो. त्यावरून याचे प्राचीनत्व लक्षात येते. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पत्रिका श्री अंबादेवीला आली होती याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. इ.स. १८७० चे ‘गॅझेटियर फॉर दी हैद्राबाद असाईन्ड डिस्टिक्क्ट’ तसेच इ.स. १९११ व १९६८ च्या अमरावती जिल्हा गॅझिटियरमध्ये याच्या पुरातनत्वाचा उल्लेख आहे. ‘सेटलमेंट रेकॉर्ड’मध्येही हे मंदिर एक हजार ते १५०० वर्षांपूर्वीचे पुरातन असल्याचा पुरावा आढळतो. इ.स. १८६३-१८६४ सालापर्यंत श्री अंबादेवीची मूर्ती केवळ एका चबुतऱ्यावर होती. मंदिर नव्हते. मात्र कालांतराने तेथे छोटे हेमाडपंती मंदिर बांधण्यात आले. त्या काळी वस्ती अमरावतीच्या परकोटाच्या आतच होती. त्यामुळे हे मंदिर जुन्या अमरावतीच्या वेशीवर जंगलात होते. मंदिराच्या शिखराचे बांधकाम इ.स. १८९६ मध्ये करण्यात आले.

श्री अंबादेवीची मूर्ती आसनावर विराजमान असून पद्मासनात आहे. तिचे दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवलेले आहेत. दोन्ही नेत्र अर्धोन्मिलित असून शांत आणि गंभीर अशी ध्यानस्थ मुद्रा धारण केलेली आहे. नानाविध षोड्शोपचार पूजा झाल्यावर सुवर्णादि अलंकार, सोन्याचा मुलामा चढविलेला मुखवटा आणि सर्व प्रकारचे अलंकार चढवून विविध पुष्पांची आरास करून देवीला सजविल्यानंतर तिचे देखणे व प्रसन्न रूप भक्तांना आनंदित करते. सोन्याचा मुलामा चढविलेला चांदीचा मुखवटा ९० तोळ्यांचा असून तो १९०५  मध्ये बनविला आहे. महापूजेनंतर आरती व दुपारी १२ वाजता महानवेद्य होतो. पुरणपोळी व खीर यांचा नवेद्य रोज असतो तसेच तांबूलाचा महानवेद्यही होतो. भक्तांना प्रसाद वाटण्यात येतो.

श्री अंबादेवी मंदिरात जाण्यासाठी पूर्वेकडून मुख्य द्वार असून सुमारे दहा दगडी पायऱ्या चढून वर जावे लागते. आत गेल्यावर पुन्हा सहा-सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावर गर्भगृहाच्या समोरील सभामंडपात जाता येते. मंदिराला दोन घुमट असून ते दुरून दिसतात. त्यांच्यावर सोन्याचा मुलामा चढविलेले चांदीचे दोन कलश दिसतात, त्यांचे नूतनीकरण इ.स. १९०६ साली करण्यात आले. मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा करण्यासाठी प्रशस्त जागा आहे. मंदिर परिसराच्या उत्तरेकडे श्री हनुमानाचे छोटे मंदिर आहे. मागे महादेवाचे छोटे मंदिर आहे.

श्री अंबादेवीच्या गर्भगृहाला लागूनच डाव्या बाजूला भरवनाथाची मूर्ती आहे. उजव्या बाजूला िभतीवरच्या कोनाडय़ात संगमरवरी श्री गणेशाची मूर्ती आहे. तिच्या उजवीकडे आणखी एक गर्भगृह असून त्यात श्री महादेवाची मोठी िपड आहे. मंदिरात शिरल्यावर उजव्या बाजूला मंदिराचे कार्यालय व देणगी इत्यादी देण्यासाठी काऊंटर आहेत. पलीकडे भोजनगृह वगैरे आहे. कार्यालयाला लागून हनुमानाचे मंदिर असून तेथे प्रवचनासाठी हॉल आहे.  मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवसांना भक्तांची गर्दी असते. मंगळवारी लहानशी यात्राच भरते. नवरात्र महोत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा होतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते आणि सप्तशतीच्या पाठाने अष्टमीला यज्ञ होतो, हवन करतात. हा उत्सव नऊ दिवस चालतो. या काळात श्री एकवीरा देवी प्रतिनिधिक स्वरूपात या मंदिरात उपस्थित असते असे मानतात. त्यामुळे हवनासाठी दोन स्थंडिले तयार करतात. दोन स्थंडिलांपैकी एके ठिकाणी श्री अंबादेवी संस्थानाचे मानकरी व दुसरे ठिकाणी एकवीरा देवीचे मानकरी हवन करतात. दशमीला म्हणजे विजयादशमीचे दिवशी श्री अंबादेवीची पालखी सीमोल्लंघनासाठी दसरा आसनाजवळ जाते. ही पालखी संपूर्ण चांदीची असून आठही बाजूला चांदीचे खांब आहेत. वर सुवर्णाचा कळस असतो. पालखीसोबत दोन्ही मंदिराचे मानकरी व विश्वस्त असतात. समोर वाद्यवृंद असतो. फार मोठय़ा संख्येने लोक असतात. ही पालखी दुपारी चार वाजता सीमोल्लंघनाला निघते. मंगलवाद्य्ो आणि चौघडा आणि तुतारीही असते. रस्त्यात अनेक भक्त पालखीचे स्वागत सुवासिनींच्या हस्ते ओवाळून करतात. सीमोल्लंघनाच्या रात्री आरती होऊन पालखी परत निघते. मंदिरात आल्यावर दोन्ही देवींची पूजा व आरती होते. अश्विन वद्य दोन ते कार्तिक वद्य दोन या काळात मंदिरात काकड आरती होते. दरवर्षी चत्र महिन्यात शतचंडीचे पाठ रामनवमी महोत्सवात करतात. अष्टमीला हवन होऊन पूर्णाहुती देण्यात येते.

श्री एकवीरा देवी, अमरावती

श्री अंबादेवी मंदिराचे दक्षिण बाजूला, अंबा नाल्यावरील पूल ओलांडल्यावर श्री एकवीरा देवीचे मंदिर आहे. एकवीरा देवीला मोठी देवी (मोठी बहीण) आणि अंबादेवीला लहान देवी (लहान बहीण) म्हणण्याचा प्रघात आहे. या मंदिराचा संबंध श्री जानर्दनस्वामी नावाच्या सत्पुरुषाशी लावण्यात येतो. १७ व्या शतकात इ.स. १६४० च्या सुमारास देवीचे भक्त श्री जनार्दनस्वामी अमरावतील आले. अंबा नाल्याचे जागी त्यावेळी एक ओढा होता. त्याचे काठी निसर्गरम्य वातावरणात त्यांचा मुक्काम होता. तीरावर त्यांची पर्णकुटी होती. ते रोज जगदंबेचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न ग्रहण करीत नसत. एकदा पावसाळ्यात अंबा नाल्याला पूर आला, त्यामुळे त्यांना जगदंबेचे दर्शन घेणे अशक्य झाले. स्वामींनी तीन दिवस अन्न-पाणीही घेतले नाही. तेव्हा श्री जगदंबेने त्यांना दृष्टांत दिला व अशी आकाशवाणी झाली की, ‘ज्या विहिरीचे पाणी तुम्ही स्नानसंध्येसाठी घेता तिच्या काठावर जो बाण आहे-तो बाण म्हणजे मीच होय. त्याची प्राणप्रतिष्ठा करून दर्शन घ्यावे,’ असे सांगतात. स्वामींनी त्याप्रमाणेच केले. तीच आजची एकवीरा देवी होय. या आख्यायिकेनुसार एकवीरा देवीची ही स्थापना इ.स. १६६० मध्ये झाली. पुढे मोठे मंदिर बांधण्यात आले. या एकवीरा देवीच्या मंदिरात एक भुयार आहे. मंदिराच्या दक्षिण बाजूस असलेल्या मंदिराच्या वाटेवरच्या विहिरीपर्यंत ते आहे. एक व्यक्ती सहज बसू शकेल असा एक मोठा कोनाडाही विहिरीत आहे. याच मार्गाने जनार्दनस्वामी स्नानसंध्येसाठी तेथे जात असावेत असे लोक सांगतात. जनार्दन स्वामी हे मूळचे अमरावतीजवळील नांदगावपेठ गावाचे राहाणारे होते. पेठकर या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता.

मंदिरात वर्षभर धार्मिक कार्यक्रम चालतात. अश्विन नवरात्र, मंगळवार, शुक्रवार या काळात भक्तांची गर्दी असते. एकवीरा देवीच्या नावाचा यज्ञ अंबादेवीच्या देवळातच होतो. दसऱ्याच्या सीमोल्लंघनाला एकवीरा देवीची मूर्तीही अंबादेवीच्या पालखीतच सीमोल्लंघनास निघते. मंगळवार, शुक्रवार व सणांच्या दिवशी देवीस साजशृंगार केला जातो. या दोन्ही मंदिराच्या परिसरात दुकानांची मोठी बाजारपेठ आहे. पूजा साहित्याबरोबरच धार्मिक पुस्तके, लाकडी वस्तू, संसारोपयोगी वस्तू, बांगडय़ा इत्यादींची दुकाने आहेत. याच बाजारपेठेत श्री बालाजीचेही मंदिर आहे.

श्री महालक्ष्मी जगदंबा, कोराडी

नागपूर जिल्ह्य़ातील कामठी तहसीलीत नागपूर-जबलपूर महामार्गावर नागपूरपासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर कोराडी हे गाव आहे. कोराडीजवळ असलेले औष्णिक विद्युत केंद्र प्रसिद्ध आहे. महामार्गापासून सुमारे एक कि.मी. आत गेल्यावर श्री महालक्ष्मी जगदंबेचे मंदिर आहे. एकेकाळी येथे घनदाट जंगल होते. जुने मंदिर लहानसे असून हेमाडपंती धाटणीचे बांधले होते. परंतु आता त्याचे नूतनीकरण झाले आहे व होत आहे. मंदिर परिसरात शिविपड असून नंदी आहे. शिवपार्वती, गणेश आणि दक्षिणामुखी हनुमान यांच्याही मूर्ती आहेत, मंदिर प्रांगणात औदुंबराचा वृक्ष असून एक जलाशय पण आहे. त्यात कमळाची फुले फुलतात. श्री महालक्ष्मी जगदंबेची मूर्ती दगडी असून सुमारे तीन फूट उंचीची असावी. ती अतिप्राचीन असून स्वयंभू असावी असे मानण्यात येते. मूर्ती चतुर्भुज असून तिच्या उजवीकडील दोन हातांमधे त्रिशूळ आणि खड्ग आहेत, व डावीकडील हातांमधे डमरू आणि धनुष्य आहे. या मूर्तीचे वैशिष्टय़ म्हणजे तिच्या मूळ रूपाकडे पाहता सकाळी कन्या (बालरूप), दुपारी तरुण (युवारूप), सायंकाळी प्रौढ (वृद्धरूप) असे दर्शन होते असे भक्त मानतात. परंतु सामान्यत: मूर्तीला सोन्याचा मुलामा दिलेला चांदीचा मुखवटा स्नानादि उपचारानंतर चढविलेला असतो. सोन्याच्या अलंकारांनी आणि पुष्पांची आरास करून मूर्ती सजवितात तेव्हा मूर्तीचे स्वरूप विलोभनीय दिसते. प्राचीन काळी ही देवी भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्य़ांतील झाडीपट्टीच्या भागातून आली अशी लोकभावना आहे. सध्याच्या मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर टेकडी असून तिच्यावर जगदंबेचा भाऊ दत्तासून याचे मंदिर आहे. या मंदिरात चत्र नवरात्रात झाडीपट्टीतून हजारोंच्या संख्येने भक्त येत असत. त्यात पाटोडे आणि गायधने हे लोक मोठय़ा प्रमाणावर बलगाडीने येत असत. जवळच असलेल्या सुरादेवी नावाच्या तलावावर स्नान करीत. जवळच्या गावांमधील घरांमध्ये जोगवा मागीत आणि रोडगा बनवून देवीला अर्पण करून दर्शन घेत. त्या काळी कोंबडा व बकरा यांचा बळी देण्यात येत असे. दारू प्राशन करीत असत. आता मात्र ही प्रथा बंद झाली असून बळीऐवजी काशी कोहळे किंवा खिचडीचा प्रतीकात्मक बळीरूपाने नवेद्य अर्पण करतात. हल्ली या मंदिरात रोजचा प्रसाद म्हणून हलवा (शिरा), रव्याची खीर देतात. चिरंजीचे साखर दाणे व शेंगदाणे यांचाही प्रसाद देण्यात येतो.  अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीची नवरात्र असते. सुमारे १५ ते २० लाख लोक या नवरात्रीच्या काळात दर्शनाला येतात. घटावर नारळ ठेवून अखंड दीपज्योती नवरात्र काळात लावण्यात येतात. यांची संख्या साडेसहा हजारांच्या जवळपास असते. चत्र शुद्ध प्रतिपदेपासून चत्रातील नवरात्रही असते. पूर्वीच्या काळी याच नवरात्रात झाडीपट्टीतून हजारोंच्या संख्येने भक्त येत आणि सव्वा महिन्यांपर्यंत हा उत्सव चालत असे. परंतु हल्लीच्या काळी भक्तांची संख्या कमी झाली असून आश्विन नवरात्रीलाच जास्त लोक येतात. या नवरात्रांत केवळ महाराष्ट्रच नव्हे तर छत्तीसगढ, मध्य प्रदेशपासून भक्त येतात. वर्षांतून आठ वेळा महापूजा होते. ही देवी नवसाला पावते अशी भक्तांची श्रद्धा आहे.

मंदिर परिसर फार मोठा व प्रशस्त असून जलाशयाजवळ हरिसिंग बाबांचा आश्रम आहे. एक धर्मशाळाही आहे. मंदिरात शिरण्यापूर्वी पूजा साहित्य, फुले, प्रसाद, बांगडय़ा इत्यादींची दुकाने आहेत. तसेच रांगोळी आणि नित्योपयोगी वस्तूंची तसेच तांब्यापितळेच्या वस्तू, देवदेवतांच्या मूर्ती यांचीही दुकाने आहेत. मंदिरात पूजा-अर्चा करण्यासाठी गुरव असून ते कार्य गेल्या सात पिढय़ांपासून परंपरेने श्री फुलझेले कुटुंबाकडेच आहे. त्यांच्यातीलच एक विश्वस्त मंडळावरही आहेत. हे मंदिर नागपूरकर भोसल्यांच्या मालगुजारीत येत असल्याने त्याची व्यवस्था भोसल्यांकडे होती. मात्र आता पंजीकृत विश्वस्त मंडळाकडे व्यवस्था सोपविलेली आहे.

श्री महाकाली देवी, चंद्रपूर

कृतयुगात, हल्लीच्या चंद्रपूर शहराच्या जागी ‘लोकपूर’ या नावाचे मोठे शहर होते व तेथे कृतध्वज नावाचा राजा राज्य करीत होते. त्याच्यानंतर त्याचा पुत्र सुनंद हा राज्य करू लागला. त्याच काळात तेथे महाकाली देवी प्रगट झाली अशी आख्यायिका आहे. पुढे परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रीय करण्यासाठी अनेक राज्ये नष्ट केली. त्यातच लोकपूरचे राज्यही नष्ट झाले. त्याच युगात श्रीरामचंद्र हे दक्षिणेस वनवासास निघाले असता लोकपुरातून पुढे गेले व त्याच वेळी त्यांनी हल्लीच्या चंद्रपूरच्या ईशान्येस ५० मलांवर असलेल्या चिमूर जवळच्या ‘चिमूर’ टेकडय़ातील एका टेकडीवर निवास केला असे मानतात, ती जागा आज रामदेगी (रामदिघी) म्हणून प्रसिद्ध आहे. तिथेच ‘सीताकुंड’ आहे. या टेकडीच्या पायथ्याशी राममंदिरही आहे. कलीयुगाच्या सुरुवातीस चंद्रहास्य नावाच्या राजाने महाकाली आणि अंचलेश्वर (महादेव) ही ठिकाणे पाहून तेथे राजधानी वसविली व त्याच्या नावावरून त्या नगरीस इंदूपूर किंवा चंद्रपूर असे नाव पाडले अशीही आख्यायिका आहे. (चांदा सेटलमेंट रिपोर्ट १८६९ मध्ये देण्यात आलेल्या व नंतर चांदा गॅझिटिअर १९०७ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका आख्यायिकेनुसार.) पुढे त्याचे राज्य नष्ट झाले व त्यानंतर भद्रावती ही नवीन राजधानी निर्माण झाली.

या भद्रावतीचा विस्तार उत्तरेस भटाळ्यापासून तो दक्षिणेस चंद्रपूपर्यंत होता. म्हणजे सुमारे ३५ मल लांब व १६ मल रुंद पसरलेली ही भद्रावती किंवा भांदक ही राजधानी होती. ‘भटाळा’ हे गाव वरोरा ते चिमूर या रस्त्यावर सध्या एक लहानसे गाव आहे. परंतु त्या गावात अनेक ठिकाणी खणले असता पुराणकालीन नाणी सापडतात असे तेथील लोक सांगतात. प्राचीन संदर्भाचे विश्लेषण केल्यास तत्कालीन शहर हे भद्रावती नसून भांदक आहे व पुराणातले भद्रावती हे हस्तिनापूरपासून जवळ होते. एका विस्तृत पठारावर पसरलेल्या भांदक या गावाच्या पश्चिमेला विजासन टेकडय़ा आहेत. त्यांच्यात गुहा असून त्या इसवी सन दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातल्या असाव्यात. त्यांच्यातल्या काही शिलालेखांचा काळ हा गुप्तांचा किंवा सातव्या किंवा आठव्या शतकातला असावा असे किनगहॅम यांनी म्हटले आहे. म्हणजेच भांदक ही प्राचीनकाळी विस्तृत पसरलेली नगरी होती, असे दिसते. मात्र आज त्याच नगराचा उल्लेख भांदक तसेच भद्रावती या दोन्ही नावांनी होतो. गणेशपुराणात त्याचा उल्लेख पुष्पकपूर या नावाने आला आहे. पुढे त्रेतायुगात मणिपूर, द्वापारयुगात भांदक आणि कलीयुगातही भांदक म्हणूनच ओळखले जाते. गुत्समद ऋषीने ज्या पुष्पक वनात तपश्चर्या करून श्रीगणेशाची आराधना केली व वरप्राप्तीनंतर तिथेच श्री वरदविनायक गणेशाची स्थापना केली त्या स्थानाचा उल्लेख भृगु ऋषीने लिहिलेल्या गणेशपुरात खालीलप्रमाणे आढळतो.

इदं नगरं देवयुगे पुष्पक संजितम्।

त्रेतायां मणिपुरंच, भानकं द्वापारेपिच

कलौ तु भद्रकं नामख्यातं भविष्यति॥

भानक, भद्रक या नामांचा अपभ्रंश भांदक असा होतो. भांदक हे मोठे शहर होते आणि त्यात विजासन, गवराळा, सुमठाणा इत्यादी भाग येत होते. भांदकपासून सोळा मलांवर चांदा/चंद्रपूर नावाचे खेडे आहे असे उल्लेख जुन्या साहित्यात आढळतात. भांदकच्या पश्चिमेला दोन मलांवर गौराळा हे गाव असून तिथे एक तलाव आहे. त्याला लागून असलेल्या टेकडीवर श्री वरदविनायकाचे मंदिर आहे. याच जागी गृत्समद ऋषीने तपश्चर्या केल्यानंतर श्री वरदविनायकाची स्थापना केल्याचे वरील आख्यायिकेत म्हटले आहे. याच ठिकाणी पूर्वी योवनोशाचा महाल होता असे सांगितले जाते. पुढे तो पडला व जुने देऊळ राहिले. म्हणूनच काही लोक यालाच यौवनोशाचे देऊळ किंवा महाल असे संबोधतात. याच मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूच्या (मंदिरात प्रवेश करताना डाव्या हाताच्या िभतीत) एक शिलालेख होता. त्यात संवत ११६० असा उल्लेख आहे.

त्यावरून इ.स. ११०४ मध्ये चालुक्य राजा विक्रमादित्य (सहावा) याच्या काळात हे मंदिर बांधले गेले असावे. या राजाच्या दंडनायक नावाच्या अधिकाऱ्याने इ.स. १०८७  मध्ये विजारण टेकडीजवळची काही जमीन चराईसाठी दान दिली होती.

चंद्रपूर येथील महाकाली मंदिर विदर्भ तसेच मराठवाडय़ातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच ते गोंड जमातीच्या लोकांचेही श्रद्धास्थान आहे. या देवीच्या संबंधातील उल्लेख स्कंध पुराणातील सह्य़ाद्री खंडात आढळतो. त्यानुसार असे सांगतात की, त्रेतायुगातील राजा कृतध्वज यास सुनंद नावाचा मुलगा होता. त्याला देवीने दृष्टांत दिला आणि एका विशिष्ट जागी उत्खनन करण्यास सांगितले. तेव्हा त्याला भुयारातील शिळेवर एक भव्य अशी मूर्ती दृष्टीस पडली. ती त्याने पाषाणात एक गुहा करून त्याच जागी स्थापित केली. तीच ही महाकाली देवी होय. आणखी एक आख्यायिका अशी की, खांडक्या बल्लाळ या गोंड राजाच्या राज्याची राजधानी बल्लारपूर येथे होती. ती पुढे त्याने चंद्रपूर येथे हलविली. झरपट नदीच्या कोरडय़ा पात्रात त्याला एक कुंड दिसले. त्यातील पाण्याने त्याने तोंड धुतले आणि तो ते पाणी प्यायला. त्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावरील खांडके नष्ट झाली. दुसऱ्या दिवशी त्याने तेथे जाऊन कुंडातील पाण्याने स्नान केले तेव्हा त्याच्या सर्व अंगावरील खांडके नाहीशी झाली व त्याचे शरीर तेजस्वी दिसू लागले. राजाला स्वप्नात महादेवाने दर्शन दिले. त्यामुळे राजाने ते प्राचीन कुंड महादेवाच्या पिंडीच्या आकाराचे बनविले आणि तेथे अंचलेशर महादेवाचे मंदिर बांधले. याच मंदिराच्या दक्षिण बाजूला थोडय़ा अंतरावर राजाला एक भुयार दिसले आणि त्या भुयारात खडकात कोरलेली भव्य अशी देवीची मूर्ती आढळली. तीच ही महाकाली होय. राजाने ते भुयार स्वच्छ करून तेथे देवीचे मंदिर बांधले. या तपशीलांकडे पाहता इ.स. १४९५ ते १४९७ या काळात ही मंदिरे बांधण्यात आली असावीत. नंतरच्या काळात गोंड हिराई हिने मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि महाकालीच्या जवळ एकवीरा देवीचेही मंदिर बांधले. त्यामुळे हल्लीचे मंदिर इ.स. १७०४ ते १७१९ ते या काळात बांधले गेले असावे. हल्लीच्या देवीच्या मूर्तीच्या मागच्या बाजूला छोटय़ा भुयारात देवीचा पलंग असून निद्रा घेत असलेल्या स्वरूपात महाकाली देवीच्या मूर्तीचे दर्शन होते. याच ठिकाणी ही मूर्ती सापडली असावी. या दोन्ही कथा लक्षात घेता कृतध्वजाचा पुत्र सुनंद याने भुयारात आढळलेली देवीची जी मूर्ती गुहेत स्थापन केली तीच खांडक्या बल्लाळ राजाला सापडली असावी.

श्री महाकाली देवीची मूर्ती पाच फूट उंचीची असून उंच पाषाणात कोरलेली आहे. मूर्तीला शेंदूर अर्चन करण्यात आलेले आहे. मुखवटासुद्धा बसविण्यात आला आहे. तिच्या एका हातात खड्ग व दुसऱ्या हातात ढाल आहे. मंदिरात गेल्यावर सुमारे आठ-दहा पायऱ्या उतरून गेल्यानंतर गुहेसारखे दगडी गर्भगृह आहे. त्याच्या मध्यभागी श्री महाकालीची मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहाचा दरवाजा आणि मूर्ती याच्यामध्ये फार थोडे म्हणजे दोन-तीन फुटांचेच अंतर आहे. गर्भगृह हे एखाद्या गुहेसारखेच वाटते. देवीचे मंदिर चौरस बांधणीचे व दगडी आहे. मंदिर ६० बाय ६० फुटांचे असून उंची ५० फूट आहे. त्यावर मुगल स्थापत्य शैलीची छाप आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. देवीचे गर्भगृह हे दहा फूट खोल असून १८ बाय १८ फुटांचे आहे. महाकालीची मूर्ती ही एका ३.१५ मीटर बाय १.६० मीटर बाय १.८५ मीटर आकाराच्या गुहेत स्थापित आहे. मूर्तीसमोरच्या गर्भगृहाच्या मोकळ्या जागेत महादेवाची मोठी पिंड/शिविलग स्थापित केले आहे. मंदिराच्या वर चार कोपऱ्यांवर चार घुमट आणि मध्यभागी एक मोठय़ा आकाराचा घुमट आहे. या महाकाली मंदिराभोवती मोठा परकोट असून तो इंग्रजांच्या राजवटीत सुपरिटेंडेंट कॅप्टन पिट यांनी बांधल्याचे उल्लेख आढळतात.

गोंड राजा वीरशहा (इ.स. १६९६-१७०४ ) याची पत्नी राणी हिराई हिने हे भव्य मंदिर बांधले असून वीरशहाच्या पराक्रमी विजयाचे प्रतीक म्हणून चत्र पौर्णिमेला महाकाली देवीच्या उत्सवाची प्रथाही सुरूकेली. तेव्हापासून चत्र शुद्ध प्रतिपदेला नवरात्राची सुरुवात होते व उत्सव आणि यात्रा सुरू होते. या यात्रा काळात महाकाली मंदिरात भक्त लाखोंच्या संख्येने येतात. अश्विन महिन्यातील नऊ दिवस नवरात्र उत्सव साजरा करतात. विजयादशमीलाही भक्तांची गर्दी असते. या यात्रेला विदर्भातून लोक येतातच परंतु मराठवाडय़ातूनही हजारोंच्या संख्येने लोक येतात. याची सुरुवात नांदेड जिल्ह्य़ातल्या तळेगाव उमरी या गाव्या राजाबाई देवकरीण हिच्यापासून झाली. असे सांगतात की, तिला देवीने दृष्टांत दिला आणि सांगितले की, ‘‘मी चंद्रपूर परगण्यात आले, तू माझ्या भक्तीचा प्रचार कर.’’ राजाबाई तिच्यासोबत मोठय़ा संख्येने देवी भक्तांना घेऊन देवीच्या दर्शनास आली. तेव्हापासून नांदेड, परभणी, बेदर इत्यादी भागांतून फार मोठय़ा संख्येने लोक येतात. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तिसगड इ. भागातील गोंड आदिवासी तसेच इतरही जाती-जमातींचे लोक मोठय़ा प्रमाणावर येतात. आंध्र प्रदेश, तेलंगणा इथून पोतराज या यात्रेला येतात. पोतराज म्हणजे देवीचे गावोगाव हिंडणारे भक्त. ते इथे दर्शनाला मोठय़ा प्रमाणात येतात. देवीच्या पुरुष भक्तांना पोतराज आणि स्त्री भक्तांना देवकरीण असे म्हणतात. पुरुष पोतराज स्त्रियांप्रमाणे केस वाढवून अंबाडा बांधतात आणि कपाळावर कुंकवाचा मळवट भरतात. कमरेभोवती हिरव्या रंगाचा घागरा व त्यावर घुंगराची माळ व पायात मोठे पितळी वाळे असतात. कमरेवरचे अंग उघडे असते. त्यांच्या हातात शेवटी निमुळता होत गेलेला चार ते पाच फूट लांबीचा व तीन ते चार इंच व्यासाचा ‘साठ’ (आसूड) असतो. कौल मिळाल्यावर तो सोट ते गरगर फिरवून स्वत:च्या अंगावर मारतात. त्याच्यासोबत एक स्त्री असून तिच्या डोक्यावर एका परातीत किंवा टोपलीत देवीचा मुखवटा ठेवलेला असतो. त्याची मळवट भरून पूजा केलेली असते. तिच्या हातात एक डफ असून ती दोन काडय़ांनी त्यातून आवाज काढत असते. यात्रेला दूरदूरून आलेले लोक रात्री मंदिर परिसरात पडाव टाकून विसावतात व रात्रभर डफरे वाजवून स्तवनगीते म्हणतात. देवीच्या मंदिर परिसरात आणि बाहेरील बाजूलाही प्रसाद, पूजा साहित्य, इतर संसारोपयोगी लहान वस्तू, प्लास्टिकची भांडी इत्यादींची पक्की दुकाने आहेत. चत्र महिन्यात फिरते दुकानदारही दुकाने लावतात.

श्री क्षेत्र महाकाली देवस्थान, काचनूर.

हे देवस्थान वर्धा शहरापासून ३६ कि.मी. अंतरावर आहे. तर वर्धा-कोंढाळी मार्गाने फक्त एक कि.मी. दूर आहे. हे पुरातन स्थान आहे असे सांगण्यात येते. या महाकाली देवस्थानात श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि महासरस्वती तीन शिलारूपी बाणांच्या स्वरूपात आहेत. त्रेतायुगात धौम्य ऋषींनी आपला आश्रम इथे स्थापन केला, असा लोकांचा समज आहे. हे स्थान चारही बाजूंनी पर्वतरांगांनी वेढलेले असून जवळच ढगा हे महादेवाचे प्रसिद्ध स्थान, घोडदेव आणि वानरकुंड आहे. श्रीरामाच्या राज्यभिषेकानंतर परत जाताना वानरराज सुग्रीव तहान लागली म्हणून या आश्रमाजवळ आले तेव्हा ऋषी पत्नीने पाण्याने जे कुंड निर्माण केले, असे मानतात. ते आजही वानरकुंड म्हणून प्रसिद्ध असून त्यांचे पाणी कधीही कमी होत नाही अशी लोकभावना आहे. इ.स. १९९२ साली या कुंडाजवळ शिवमंदिर निर्माण करण्यात येऊन तेथे धौम्य ऋषींची प्रतिमा बसविण्यात आली. सुमारे १०० ते १२५ वर्षांपूर्वी वर्धा नदीच्या तीरावर जमिनीत गावकऱ्यांना दृष्टांत होऊन या तीन देवतांच्या मूर्ती सापडल्या, असे सांगितले जाते. त्यानंतर त्या जागी खणून गावकऱ्यांनी त्या मूर्ती बाहेर काढल्या व त्यांची विधिवत प्रतिष्ठापना केली. येथील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी व श्री महासरस्वती या देवींच्या श्रद्धाळू भक्तांना इच्छापूर्तीचे समाधान मिळू लागले व भक्तांची संख्या वाढू लागली. सध्या हे देवस्थान दक्षिणचे वैष्णदेवी संस्थान या नावाने प्रसिद्ध झाले आहे. या मंदिराच्या समोर  १४० बाय ३० अशी सर्व सोयींनी संपन्न अशी धर्मशाळा निर्माण केली आहे. एक विशाल सभागृहदेखील आहे. धर्मशाळेला लागूनच स्वयंपाकघर असून भक्तांना भोजन तयार करण्याची व्यवस्था आहे. प्रांगणात एक दीपस्तंभ स्थापिला आहे.

या मंदिरात नववर्ष दिन म्हणजे गुढीपाडवा, गुरुपोर्णिमा, रक्षाबंधन, पोळा, नवरात्री-उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरे केले जातात. नवरात्रात पहिल्या दिवशी भगवतीला स्नानांतर सिंदूर अर्पण, नवे वस्त्र, आभूषण तसेच पूजन केले जाते. नंतर कलशांची स्थापना करतात. नवमीला मोठय़ा प्रमाणावर कलश विसर्जन करतात. या वेळेला दहा ते १५ हजार लोक असतात. सायंकाळी होम हवन होऊन महोत्सवाचा समापन विधी होतो. कोजागिरी पोर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी अखंड ज्योती उत्सवाचा प्रारंभ होतो. हा ४० दिवस चालतो. या काळात फक्त ओल्या वस्त्रानेच मंदिरात प्रवेश करता येतो. बाकी कार्यक्रम नवरात्रासारखेच असतात. ४१व्या दिवशी याचे समापन होते. या स्थानाला ‘पंचतीर्थ’ असेही म्हणतात. कारण या परिसरात पाच पावन क्षेत्रं आहेत ते म्हणजे श्री महाकाली देवस्थान, घोडदेव, वानरकुंड, ढगा आणि घानाड.

गोरजाई मंदिर, वैरागड

गडचिरोली जिल्ह्य़ातील आरमोरी तहसिलीत वैरागड हे ऐतिहासिक महत्त्वाचे स्थान असून त्याला पर्यटनस्थळ म्हणूनही महाराष्ट्र शासनाने दर्जा दिलेला आहे. हे ठिकाण गडचिरोलीपासून ४३ किलोमीटर अंतरावर आहे. या गावाजवळ खोब्रागडी आणि वैलोचना या दोन नद्यांचा संगम आहे. येथे पुरातन किल्ला आणि अनेक हेमाडपंती पद्धतीने बांधलेली मंदिरे आहेत. या भागात खोदकाम करताना दगडी मूर्ती आणि पुरून ठेवलेले धन अनेकांना सापडले आहे. वैरागडचा किल्ला ऐतिहासिक महत्त्वाचा व पुरातन आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ साडेतेरा हेक्टर आहे. याची तटबंदी २५ ते ३० फूट असून पक्की दगडांची आहे. किल्ल्याला पूर्वाभिमुख असे भव्य प्रवेशद्वार आहे. आत गेल्यास दोन्ही बाजूला पडकी घरे आढळतात. विहिरींची संख्या पूर्वी १०० च्या वर होती. या किल्ल्याभोवती खंदक आहेत. वैरागडचे पुरातन नाव ‘वजरागर’ असे आहे. (वज्र-हिरा) येथे एकेकाळी हिऱ्यांची बाजारपेठ होती. इसवी सनाच्या नवव्या शतकात नागवंशीय माना लोकांचे राज्य होते. करुमप्रदोह हा त्यांचा पहिला राजा होता. १२ व्या शतकापावेतो त्यांचे राज्य होते. पुढे हैहयवंशीय राजांचे मांडलिकत्व मानांनी स्वीकारले. पुढे हा किल्ला इ.स. १४५० नंतर बल्लापूरच्या गोंड राजाच्या ताब्यात गेला. आज मात्र परकोटाच्या आत आणि बाहेरही पडझड झालेली असून झाडे वाढलेली आहेत.

गोंड राजाचा सेनापती आणि किल्ल्याचा किल्लेदार हरिश्चंद्र याने जेव्हा किल्ल्याची सुधारणा केली तेव्हा त्याने आपल्या राज्यामध्ये सप्त धामांची निर्मिती केली. त्यातील एक धाम म्हणजे गोरजाईचे मंदिर आहे. सुमारे एक किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. माना समाजाचे लोक या देवीला आपली कुलदेवता मानतात. मोठमोठय़ा दगडांनी हेमाडपंती पद्धतीने हे मंदिर बांधले आहे. याच्या जवळूनच नदी वाहते. देवळाच्या गर्भगृहाला एक सभामंडप लागूनच आहे. या पुरातन मंदिराची किरकोळ पडझड झाली असून ते अजूनही चांगल्या स्थितीत आहे. आजही माना लोक गोरजाई मंदिराला भेट देतात.

श्री रेणुकामाता मंदिर, चिखली

चिखली हे गाव बुलढाणा जिल्ह्य़ाचे तालुक्याचे ठिकाण असून ते थंड हवेचे ठिकाण आहे. या गावात असलेले प्राचीन रेणुकामाता मंदिर  प्रसिद्ध आहे. या मंदिराची अशी आख्यायिका सांगण्यात येते की, बच्चानंद महाराज बलगाडीने पेरकुंड घेऊन जात असता त्यांच्या गाडीवर रेणुकामाता आली. त्यांनीच तिची स्थापना केली. तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार जवळजवळ १५० वर्षांपूर्वी चिखलीपासून दोन कि.मी. अंतरावर घनदाट जंगलात योगी शिवानंद आणि योगी बच्चानंद यांना रेणुकामातेचे दर्शन झाले. त्यांनी तेथेच तिची पूजा-अर्चना केली. एक छोटे मंदिर बांधले. पुढे हीच रेणुकामाता चिखली गावाची ग्राम देवता म्हणून प्रसिद्ध पावली. रेणुकामाता मंदिराच्या गाभाऱ्यात जाताच समोर शेंदूरचर्चित, उत्तराभिमुख असलेली, प्रसन्न वदना रेणुकामाता मन मोहून टाकते. तिचे तेजस्वी रूप बघून भक्तगण आनंदित होतो; भक्तिभावाने तिच्यासमोर विनम्र होतात. देवीच्या कपाळावर मोठे कुंकू असून तिच्या भांगात खडय़ामोत्याची िबदी आहे, गळ्यात मंगळसूत्र आणि इतर दागिने आहेत. कानात मासोळीच्या आकाराचे कुंडल आहेत. हिरवे वस्त्र परिधान केलेली देवी अत्यंत सुंदर दिसते. देवीच्या गाभाऱ्यातील घुमटावर अनेक देवीदेवतांच्या मूर्ती चित्रित केल्या आहेत. मंदिराबाहेरच बच्चानंद महाराजांची समाधी आहे. अश्विन महिन्यात देवीचा नवरात्रोत्सव मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत शहरातील आणि आसपासच्या गावांतील भक्तगण मोठय़ा संख्येने दर्शनाला येतात. स्त्रिया खणा-नारळाने तिची ओटी भरतात. देवीला तांबूल आवडत असल्याने तिला विडय़ाच्या पानांचा तांबूल अर्पण केला जातो; तोच प्रसाद म्हणून वाटला जातो. नवरात्रीच्या काळात या परिसरात नवचतन्य बघावयास मिळते. सनई, चौघडय़ांच्या गजरात, भाविकांच्या उपस्थितीत देवीची पूजा होते; अंबेचा जयजयकार होतो. नवरात्रात येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अंबेचा जोगवा, कीर्तन, प्रवचन, नवमीला होम- हवननंतर गावातील लहान-थोर सर्वच मंडळी देवीला सोने द्यायला जातात आणि दर्शन घेतात. चत्र महिन्यातील पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. देवीची पूजा-अर्चना झाल्यावर येथे ‘वगदी’ खेळण्याची परंपरा आहे. ‘वगदी’ म्हणजे बलगाडीवर सपाट पाटामध्ये लाकडी बल्लीच्या दांडय़ावर दुसऱ्या बल्लीचा दांडा आडवा ठेवून त्या आडव्या दांडय़ाच्या मधोमध वर एक किंवा दोन माणसं मावतील एवढी राहटीसारखी बसण्याची जागा असते. त्याला दोन्ही बाजूला लोंबकळणारे दोन झुले असतात. या झुल्यावर  बसवून फेऱ्या मारायला लावले जाते. असे सांगतात की हा ‘बगाड’सारखाच एक प्रकार असतो. चत्री पौर्णिमेला देवीची मिरवणूक गावातून ढोल-ताशांच्या गजरात काढली जाते. यावेळी भक्तगण विविध खेळ खेळतात. पहाटेपर्यंत ही शोभायात्रा चालते. देवीची प्रतिकृती प्रतिमा सजविलेल्या बलगाडीत विराजमान असते.

पारशिवनीची महालक्ष्मी

येथील मूर्ती केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील मूर्तीमध्ये विशेष गणली जाईल अशी आहे. नागपूरपासून ४४ कि.मी. वर रामटेक-मनसर रस्त्यावर पारशिवनी फाटा लागतो. त्या गावात साधारण ४० वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक पोलसाठी खड्डा खणताना व्यंकटराव सावरकर यांच्या घराच्या परसात महालक्ष्मीची दगडी प्रतिमा आढळली. दीर्घकाळ जमिनीत गाडलेली असूनही ग्रेनाइट दगडाची झळाळी कायम होती. शिरोभागी त्रिकोणी होणारी तिची पाठशिळा सुमारे ९० सेंमी. उंच आहे. त्रिकोणी शिरोभागात लहान लहान सव्यललितासनात बसलेल्या चार चार देवी प्रतिमा आहेत. तसेच दोन्ही हातांच्या पाठीमागे आणि मुकुटामागे पाठशिळेवर तीन छोटी छोटी कोष्टके आहेत. त्यातही देवी प्रतिमा आहेत. पाठशिळेवर पीठापासून वपर्यंत दोन्ही बाजूला सर्वात खाली हत्ती आणि नंतर क्रमाने घोडा, नर्तकी आणि व्याल अशा सममितिय प्रतिमा आहेत. चतुर्भुज मूर्ती समभंगात उभी असून प्रदक्षिणा क्रमाने पाहता मातुिलग, भंगलेली गदा, खेटक(ढाल) आणि पानपात्र ही आयुधे तिच्या हातात आहेत. पायापाशी डाव्या बाजूला तिचे वाहन सिंह आहे. देवीच्या आजूबाजूला चामर धारिणी, कुंभ-वाहिनी सेविका असून खाली दोन स्त्रिया हात जोडून बसलेल्या आहेत. महालक्ष्मी नखशिखान्त नटलेली आहे. मुकुट रत्नजडित असून त्याच्या दर्शनी भागावर नागयुगुल चित्रित आहे. विशेष म्हणजे मुगुटावर सयोनि लिंग आहे. शिवाय कुचबंध, उदरबंध, रत्नजडीत मेखला, कर्णकुंडले, बाजुबंद, मुद्रिका, कंकणे आणि सल नूपुर आहेत. देवी भागवतात एक वर्णन आहे-

‘‘मातुिलग गदाखेटं पानपात्रंच बिभ्रती

नागं लिंगं च योिनच बिभ्रती नृपमूद्र्धीने॥’’

हे वर्णन या मूर्तीला तंतोतंत लागू पडते. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे रूपही बहुंशी असेच आहे. पानपात्राच्या ऐवजी तिच्या हातात कमंडलू आहे एवढाच फरक. ही त्रिमितीय प्रतिमा घडविण्यासाठी कलाकाराने अक्षरश: प्राण ओतले आहेत. ही सुंदर दगडी प्रतिमा बघण्यासाठी, अभ्यासासाठी, जगभरातून चिकित्सक मूर्तीशास्त्रीय मंडळी येथे येतात. देवी नवरात्राच्या काळात हजारो भक्त येतात. अभ्यासावरून ही प्रतिमा साधारण १० व्या ११ व्या शतकातील ठरते.

नेरिपगळाई देवी (अमरावती)

सतीच्या ५२ शक्तिपीठांपकी नेरिपगळाई हे एक पीठ आहे. अमरावती-मोर्शी रस्त्यावर ३० कि.मी. अंतरावर एक गोराळा नावाची वस्ती आहे. तेथून दीड कि.मी. अंतरावर उंच टेकडीवर जगन्माता नेरिपगळाई देवीचे ठाणे आहे. मंदिर यादवकालीन म्हणजे १२ वे १३ व्या शतकातले असावे. मंदिराच्या प्राचीन बांधकामापकी गर्भगृह शिल्लक असून सभामंडप, तटबंदी महाद्वार हे नंतरचे आहे. स्वयंभू मानल्या गेलेल्या या स्थानावर असलेली तांदळा स्वरूपातील प्रतिमा विदर्भातील अनेकांची कुलदेवता आहे. सभामंडपाची व तटबंदीची बांधणी भक्कम काळ्या दगडांची आहे. मंदिर साधे असून गर्भगृह व सभामंडप हीच देवालयाची वैशिष्टय़े. पण तटबंदी मजबूत बांधणीची आहे. मंदिराचा सभामंडप व तटबंदीच्या बांधणीसाठी एलीचपूरच्या (सध्याचे अचलपूर) मुसलमान सरदाराने व भागानगरच्या नवाबाने आíथक मदत दिली अशी लोकश्रुती आहे. देवालयाच्या समोर नागपूरकर भोसल्यांनी बांधलेला जलाशय असून त्यास कर्पूर जलाशय असे म्हणतात. जलाशयाच्या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत असे मानले जाते. चर्मरोगांच्या विविध तक्रारींवर हे पाणी वापरले जाते. जलाशयात बाराही महिने पाणी असते. पिंगळमातेचे दर्शन अत्यंत विलोभनीय असून माता दिवसातून तीन वेळा रूप बदलते अशी भक्तांची श्रद्धा आहे. नवरात्रात येथे प्रचंड गर्दी असते. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत यात्रा असते. याच दरम्यान येथे जनावरांचा बाजारही भरतो. पंचक्रोशीतून हजारो भक्तगण दर्शनासाठी पायी येतात. नऊ दिवस सतत कीर्तन, प्रवचन, करमणुकीचे कार्यक्रम सुरू असतात. शिवाय प्रत्येक मंगळवारी देवीची खणा-नारळाने ओटी भरणाऱ्यांची गर्दी असते. विश्वस्त मंडळाने भक्तांच्या देणगीतून विविध पायाभूत सोयी उभारल्या आहेत. पेयजल, वीज, रस्ते, भोजन, निवास याची उत्तम व्यवस्था आहे

Navegavachi Gangadevi story in Marathi

महती देवीची : नवेगावची गंगादेवी

नागपूरपासून आंभोरा मार्गावर मांढळपासून तीन किमी दूर असलेल्या नवेगावातील गंगादेवी मंदिर जागृत स्थान  समजले असून या मंदिराला ४०० वर्षांचा इतिहास आहे. चैत्र आणि आश्विन महिन्यात होणाऱ्या देवीच्या नवरात्रात या ठिकाणी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या मंदिराच्या इतिहासाबाबत बोलताना मंदिराचे प्रमुख कृष्णा कढव यांनी सांगितले, ज्या ठिकाणी मंदिर आहे तो पूर्वी भोसलेकालीन परिसर होता. तेथे फक्त देवीची मूर्ती होती. मूर्तीवर कुठलेही शेड नव्हते. मात्र, ७५ वर्षांपूवी त्या भागात पडझड झाली होती त्यामुळे त्या भागातील घरे आणि मंदिर उध्वस्त झाली मंदिर जसेच्या तसे राहिले. नंतर मंदिराची डागडुजी करून भाविकांसाठी सोय करण्यात आली. श्रीमंत राजे भोसले या मंदिरात येत असत, असा इतिहासात उल्लेख आहे. ब्रिटीशांच्या काळात भिवानी भगत देवीच्या मंदिराची पूजा व तेथील व्यवस्था पहात होते. भिवानी भगत हे सिद्ध पुरूष होते. स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्यांना ब्रिटिशांनी अटक केली होती. रातोरात दैवीशक्तीने उमरेडच्या जेलमधून ते बाहेर आले आणि देवीच्या मंदिरात जाऊन बसले, अशी आख्यायिका आहे. मध्यंतरीच्या काळात मंदिरात पडझड झाली होती. अंधश्रद्धा आणि बुवाबाजीचे प्रकार या भागात मोठय़ा प्रमाणात वाढू लागले होते.
१२ ऑक्टोबर १९९५ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू केला आहे. गंगादेवीची मूर्ती स्वयंभू आहे की त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली याचा उल्लेख मात्र कुठेच नाही. चारशे वर्षांपेक्षा जास्त इतिहास या देवी मंदिराला आहे. मंदिराचा जीर्णोद्धार सुरू केला त्यावेळी कोणाकडून आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती पण मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम होत गेले आणि आज या ठिकाणी प्रशस्त असे मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर कलश आणि मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यावेळी महालक्ष्मी याग आयोजित करण्यात आला होता. मंदिरात गेल्या तीन वर्षांपासून देवी भागवत सुरू आहे. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, जिल्ह्य़ातील अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. येथे २००८ मध्ये शतचंडी याग आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आजूबाजूच्या गावातील ५० हजारापेक्षा अधिक भाविक उपस्थित होते. नवरात्र उत्सवात मंदिरात दररोज भजन कीर्तन आणि महाप्रसाद आयोजित केला जातो. सकाळी ७ वाजेपासून कुही, मांढळ, आंभोरा या परिसरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिरात गेल्या अकरा वर्षांपासून उन्हाळ्याच्या सुटीमध्ये मंदिरात बालसंस्कार शिबीर आयोजित करण्यात येत असून आतापर्यंत ग्रामीण भागातील एक हजारावर त्याचा लाभ घेतला आहे. ह.भ.प. बारई महाराज या मंदिरात विविध उपक्रम राबवत असतात. या शिवाय अमृत दिवाण गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम राबवले जातात. नुकतेच गो-ग्राम यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या परिसरात येणाऱ्या काळात धर्मशाळा, गो शाळा आणि संस्कार शिबिरासाठी सभागृह बांधण्याचा मानस असल्याचे कृष्णा कढव यांनी सांगितले.

Ganojachi Mahalakshmi story in marathi

महती देवीची : गणोजाची महालक्ष्मी

गणोजा येथील महालक्ष्मी स्वयंभू असून कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दुसरे रूप असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. अमरावतीपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गणोजा (देवी) येथील महालक्ष्मीच्या मंदिराला सुमारे पाचशे वर्षांचा इतिहास लाभला आहे. गणोजा येथील गणू भट हे महाराष्ट्रातील शक्तीपीठ कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे परमभक्त होऊन गेले. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दरवर्षी नवरात्रात गणू भट कोल्हापूरला अनवाणी जात असत. दर्शनात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. वृध्दावस्थेला आल्यानंतर गणू भट यांनी देवीला विनवणी केली की, यापुढे मी तुझ्या दर्शनाकरिता कोल्हापूरला येऊ शकरणार नाही. त्यावेळी महालक्ष्मीने गणू यांना दर्शन देऊन सांगितले की, आता मीच तुझ्या गावी येणार आहे. तू येथून निघाल्यावर मागे वळून पाहू नको, असे म्हणून देवी अदृष्य झाली. गणू  गावी पोहोचत असताना त्यांनी गणोजानजीकच्या नदीजवळ मागे वळून बघितले. त्याचवेळी चमत्कार झाला आणि मागे येणारी महालक्ष्मी त्या नदीच्या काठावर अंतर्धान पावली, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून या गावाला सुद्धा गणोजा देवी नाव पडले.
पाचशे वर्षांपीर्वी नदीपात्राच्या उत्खननात काळ्या पाषाणाची तेजस्वी मूर्ती सापडली. गावकऱ्यांनी मार्गशीर्ष पौर्णिमेला या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, असे सांगितले जाते. या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले असून नवरात्रात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. देवीच्या दर्शनासाठी विदर्भातील कानाकोपऱ्यातून भाविक येतात. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाणे शक्य नसले तरी गणोजा येथे गेल्यास महालक्ष्मीचे दर्शन घेतल्याचे समाधान होते, असे भक्त सांगतात.
गणोजा येथील या मंदिरात अखंड काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. अडीच फूट उंचीची ही मूर्ती चतूर्भूज आणि सिंहासनावर विराजमान आहे. देवीच्या एका हाती त्रिशूल आहे. दुसऱ्या हाती ढाल, तिसऱ्या हाती गदा आणि चौथ्या हाती पद्म आहे. डोक्यावर मुकूट आहे.
पेढी नदीच्या किनाऱ्यावरच पूर्वमुखी भव्य मंदिर आहे. मंदिराचा घुमट दर्शनीय असून घुमटाच्या दगडांवर कोरीव काम करण्यात आले आहे. मंदिरातच राधाकृष्ण, विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या मूर्ती आहेत.
यात्रेच्या काळात या ठिकाणी तीर्थस्थापना, अखंड वीणा वादन, षोडशोपचार पूजा, अभिषेक, कीर्तन, हरीपाठ, भारूड, भागवत कथा, दहीहांडी, महाप्रसाद असे कार्यक्रम होतात. नवरात्रात देवीचा सोन्याचा मुखवटा विलोभनीय दिसतो. दागिन्यांनी सजलेले देवीचे रूप भक्तांना वेगळीच अनुभूती देत असते. संस्थानचे अध्यक्ष रा.ना. गणोरकर, उपाध्यक्ष प्र.ग. केवले व त्यांचे सहकारी मंदिर परिसराच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहेत.   

Mohadichi Maa Chaundeshwari story in Marathi

महती देवीची : मोहाडीची माँ चौंडेश्वरी


भंडारा जिल्ह्य़ात भंडारा-तुमसर राजमार्गावरील मोहाडी या तालुक्याच्या गावी माँ चौंडेश्वरीचे मंदिर आहे. हे जागृत देवस्थान असल्याची लोकश्रद्धा आहे. मोहाडी परिसराचे हे आराध्यदैवत आहे. गेल्या काही वर्षांपासून येथे नवरात्र महोत्सव होत असून केवळ विदर्भच नाही तर, मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील भाविक महोत्सवात माँ चौंडेश्वरीच्या दर्शनाला येतात. मुख्य घटाव्यतिरिक्त मंदिर परिसरात यावर्षी ९३२ घटांची स्थापना झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या ७७८ होती. विजयादशमीला महाप्रसाद होतो. परिसरातील ३०-३५ हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. व्यवस्थापन मंदिर-समिती तसेच, नवदुर्गा विद्यार्थी युवक मंडळाकडे असते. नवरात्रात येथे यात्रेचे स्वरूप येते.  यात्रेत चांगलाच बाजार भरतो. मोहाडीच्या पश्चिमेला माँ चौंडेश्वरी देवीचे मंदिर आहे. या परिसराला टेकडी म्हटले जाते. टेकडी परिसराला तीर्थक्षेत्र गायमुखवरून निघालेल्या गायमुख नंदीने विळखा घातला असून परिसर वनराईसदृश्य झाडाझुडुपांनी निसर्गरम्य केला आहे. नवरात्रीतील रोषणाईने तो आणखीच उजळून दिसतो.
प्राचीन काळी गायमुख नदी व दाट वनराई असलेल्या या तपोवनात महाचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यज्ञाच्या आवर्तनासाठी दूरदुरून ऋणीमुनी आले होते. यज्ञसामुग्री संपली. ठराविक मंत्रोच्चारही संपले. ऋणीमुनींनी वेदमंत्र म्हणायला प्रारंभ केला. चारही वेदांनी केलेले स्तवन ऐकून हवनकुंडातून गर्जना करत महाचंडीचा चेहरा बाहेर आला. साधना करणाऱ्यांची मनोकामना पूर्ण करण्याचे आशीर्वचन तिने दिले. चारही वेदांनी केलेल्या स्तवनाने देवी प्रसन्न झाली म्हणून तिला ‘चौवेदेश्वरी’ हे नाव पडले. पुढे अपभ्रंश होऊन ते ‘चौंडेश्वरी’ झाले. याच कथेचे अन्य कथानक म्हणजे, यज्ञसाहित्य संपल्यामुळे ऋषिमुनींनी बाजूला ठेवलेल्या ग्रंथरूपातील ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्व वेदाताचे एकेक पान हवनकुंडात टाकले आणि प्रसन्न होऊन देवी प्रकट झाली.
कनोज प्रदेशातील रेणू राजाची कामेष्टीय यज्ञाच्या अग्नीतून निघालेली कन्या रेणुका हिने जसे अपत्य वात्सल्यातून भूगर्भातून मस्तक वर काढून पुत्र परशुरामाला दर्शन दिले अशाच शक्तीरूप देवता महाराष्ट्रात डोंगर पहाडावर प्रकटल्या. त्यांना कुठे रेणुका, कुठे योगेश्वरी, कुठे महालक्ष्मी, कुठे दुर्गा नाव मिळाले. अशीच कथा माँ चौंडेश्वरीची आहे. माँ चौंडेश्वरीचा फक्त भव्य चेहरा जमिनीवर आहे. तिचे डोळे, नाक, कान, मुख दिसते.
टेकडी परिसरात माँ चौंडेश्वरीची मूर्ती उघडय़ावर होती. संत नारायण स्वामी नावाचे भक्त पूजाअर्चा करत. पुढे स्वामी कुटुंबात कोणी उरले नाही. ब्रिटीश काळात लहानसे मंदिर उभारले गेले. त्यानंतर आधुनिक काळात भक्तांनी देवस्थान मोठे केले. उत्पन्न येत गेले. देवस्थानाचा विस्तार होत गेला. सुंदर बगीचा, धर्मशाळा, सभोवताल भिंत, उंच जागेचे सपाटीकरण झाले. देवदेवतांचे विस्तारीकरणही झाले. सोबतीला शिरडीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, शंकर भोलेनाथ, गणेशाची स्थापना झाली. एका लहान मंदिरात नारायण स्वामींच्या पादुका ठेवण्यात आल्या. विविध स्पर्धानाही आता प्रारंभ झाला आहे. मंदिराच्या उत्पन्नातून धर्मार्थ दवाखाना, अ‍ॅम्ब्युलन्स, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, असे विविध सामाजिक उपक्रमही पुढे राबवले जाऊ शकतात.
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचे एकत्रीकरण म्हणजे आदिमाया किंवा जगदंबा. तिचेच एक रूप म्हणजे माँ चौंडेश्वरी. अलंकारांनी मढवलेल्या देवीचे आकर्षक डोळे नागपूर शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे कला तज्ज्ञ तसेच, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सन्मानित प्रा. प्रमोद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली तयार             करण्यात आले. त्यामुळे माँ चौंडेश्वरीचे गोजरे विलोभनीय रूप अधिक आकर्षक झाले आहे.

Paradichi Bhavani Devi story in Marathi

पारडीची भवानी देवी

विदर्भात जागृत शक्तीस्थानांमध्ये जी काही देवीची स्थान आहे त्यात पारडीतील भवानी मंदिराचे नाव घेतले जाते. नागपूर जिल्ह्य़ात भंडारा मार्गावर असलेल्या पारडी परिसरातील भवानी देवीच्या मंदिराला अडिचशे वर्षांचा इतिहास असून देवीची मूर्ती स्वयंभू असल्याने हे मंदिर जागृत असल्याचे या भागातील नागरिक सांगतात.

भार्गव परशुरामपिता ऋषी जमदग्नी यांची कामधेनू नृपती कार्मविर्य सहस्त्रार्जुनाने (महिष्पती महेश्वर इ.स. पूर्व १९६०) पळविली. त्यांच्या सेनापतीने जमदग्नीचा वध केला. माता रेणुका पतीच्या शवाबरोबर सती गेली. महातेजस्वी परशुरामांना हे कळले पण तुर्त त्यांनी राग आवळला. माता पित्याच्या देहाला कावडीमध्ये ठेवून ते माहुरक्षेत्री आले. पुढे शोकाकुल परशुरामांना रेणुका मातेने पृथ्वीच्या गर्भातून केवळ मानेपर्यंत वर येऊन दर्शन दिले तेव्हा अशा मुखवटय़ांना तांदळादेवी म्हटल्या जात होते. महाराष्ट्रात असा प्रकारच्या प्रतिमा अंबेजागाई, माहुर , पारडी अमरावती, बाळापूर व सोलापूर याथे आढलेल्या आहेत असा इतिहासामध्ये उल्लेख आहे. भंडारा मार्गावर असलेले पारडी हे गाव पूर्वी गाव असले तरी आज ते शहारत समाविष्ट करण्यात आले. पारडी परिसरातील पुनापूर छोटय़ा गावातील शेतात ही देवीची मूर्ती आढळली असल्याचा उल्लेख आहे.

भवानी मातेच्या मूर्तीला २५० वर्षांपेक्षा जास्त इतिहास आहे. ही मूर्ती भोसलेकालिन असावी असे पुरातत्व विभागाचे मत असल्याची माहिती मंडळाचे सहसचिव दिवाकर धोपटे यांनी दिली. ही मूर्ती जमिनीतून फक्त मानेपर्यंत वर आली असून  स्वयंभू असल्याचे बोलले जाते. त्यावेळी मुन्ना महाराज नावाचे एक गृहस्थ भवानी मातेची पूजा करीत असत. एकदा माता त्यांच्या स्वप्नात आली आणि वर काढ मला असा तिने आवाज दिला. हे ऐकून मुन्ना घाबरले पण त्यांनी हिंमत करून परिसरातील पाच सहा जणांना ही गोष्ट सांगितली. त्यामुळे सगळ्यांनी त्या भागात खोदकाम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खोदकाम सुरू असताना मातेचा मुखवटा दिसून आला. मानेपासून वर मुखवटा असलेली २ ते अडीच फुटाची असलेली करंड पद्धतीचा मुकूट धारण केलेला मुखवटा दिसून आला अशी या देवीची कथा आहे. माहुरच्या देवीची प्रतिकृती मानल्या जाणाऱ्या भवानी मातेच्या अतिशय देखण्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

पारडी भागातील पुनापूरमध्ये छोटय़ाशा जागेत असलेल्या या मंदिराचे लालचंद मालू या भाविकांच्या मदतीने जिर्णोद्धरा करण्यात आला असून त्या ठिकाणी भव्य मंदिर बांधण्याक आले आहे. २००६ मध्ये मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले त्यानंतर भवानी मता सेवा समिती स्थापन करून ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. या भागात भव्य उभारण्यात आले असून मंदिराच्या परिसरात भक्तासाठी सभागृह आणि खोल्या बांधण्यात आल्या आहेत.

नवरात्र उत्सवात कोराडीप्रमाणे भवानी देवीच्या दर्शनाला नागपूरातील नाही तर विदर्भ , छत्तीसगड, मध्यप्रदेशमधील भाविक मोठय़ा प्रमाणात येत असतात. मंदिराच्या आजूहाजूचा परिसराचे शुशोभिकरण करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवात सात आठ आठ लोक दर्शनासाठी येत असतात. सकाळी ५ वाजता भाविकांच्या रांगा दर्शनासाठी लागतात. मंदिर परिसरात हॉस्पिटल बांधण्यात आले असून त्यामध्ये गोरगरीब लोकांना विविध सुविधा दिल्या जातात. येणाऱ्या काळात १०० बेडचे अत्याधुनिक साधन असलेले हॉस्पिटल बांधण्याचा मंदिर व्यवस्थापनाचा विचार आहे. परिसरात धर्मशाळा असून अनेक कार्यक्रम त्यात होत असतात. बाहेरगावावरून येणाऱ्या भाविकांची राहण्याची सोय मंदिरातर्फे केली जाते. नऊ दिवस होणाऱ्या या उत्सवात होमहवन, जागरण आणि महाप्रसाद आयोजित केला जातो. महाप्रसादाचा लाभ एक ते दीड लाख भाविक घेत असतात.   

Sahastrachandi Devi story in Marathi Ayachit Mandir Nagpur





Chandrapur Mahakali story in Marathi

Chandrapur Mahakali Photo

chandrapur cha itihas marathi
chandrapur history in hindi
chandrapur mahakali story in telugu
mahakali temple chandrapur
chandrapur gond raja history in marathi
chandrapur chi mahakali mandir
chandrapur mahakali story in english
chandrapur mahakali mandir history in telugu

Mahalaxmi Devi story in Marathi

Mahalaxmi Devi story in Marathi



mahalaxmi story in marathi
mahalaxmi chi mahiti marathi madhe
mahalaxmi chi katha marathi
margashirsha mahalaxmi vrat katha in marathi
mahalaxmi vrat katha in marathi mp3 free download
mahalakshmi vrat katha in marathi pdf download
mahalaxmi mahatmya book
mahalaxmi chi kahani marathi

Saptashrungi Devi story in Marathi language

Saptashrungi Devi Photo

saptashrungi devi story in marathi language

saptashrungi chi katha marathi
saptashrungi devi story in hindi language
saptashrungi devi images
saptashrungi devi real story
saptashrungi devi upasana
saptashrungi stotra in marathi
saptashrungi train
saptashrungi devi temple website

Bhavani mata story in Marathi

Tulja Bhavani photo



tulja bhavani
tulja bhavani chi katha marathi
tuljapur
tulja bhavani pooja vidhi in marathi
tulja bhavani image
tuljapur tulja bhavani information in marathi
tulja bhavani temple official website
tulja bhavani marathi picture

tulja bhavani mantra
bhavani name love
bhavani name in telugu
bhavni meaning

tulja bhavani photo
bhavani temple